शेतकऱ्यांच्या शेतमालाला लाभकारी मूल्य मिळावे – भारतीय किसान संघ (व्हिडिओ)

0
10
शेतकऱ्यांच्या शेतमालाला लाभकारी मूल्य मिळावे - भारतीय किसान संघ (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत (लाभकारी मूल्य) साठी भारतीय किसान संघाने आज दि.८ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन छेडले त्याला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून थेट पंतप्रधान व केंद्रीय कृषी मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना सादर करण्यात आले.

सद्यस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत न मिळाल्यामुळे गरीब शेतकरी आणखी गरीब आणि कर्जबाजारी होत चालला आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची भविष्य अंधकारमय आणि स्वत:चे जीवन नरकमय झाले आहे. सरकार आपल्या परीने शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते परंतु क्षणिक सांत्वना मुळे शेतकऱ्यांची परिस्थिति सुधारणे अशक्य आहे. उत्पादनखर्च आणि त्यावर ठराविक लाभ देणे सरकारने सुरू करावे एवढीच त्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे अन्यथा बेरोजगारीच्या या वातावरणात शेतकरी एकटा नाही तर परिवारासमवेत आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल.

सरकार के वळ काही उत्पादनांवर किमान आधारभूत रक्कम घोषित करून या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. किमान आधारभूत रक्कम केवळ भ्रम आहे हे सगळे ओळखून आहेत. गरीब शेतकऱ्यांना बाजाराच्या भरवश्यावर सोडून देणे आणि उत्पादनाच्या किमतीवर सरकारी नियंत्रण ठेवणे हे मानवी जीवन बरबादकरण्यासारखे पाप नाही तर अजून काय आहे? असा सवाल उपस्थित होतो.

शेतकऱ्यांना किमान आधारभूत रक्कम नाही तर ‘उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत’ द्यावी, एकदा घोषित केलेल्या फायदेशीर किमतीत(लाभकारी मूल्य) वेळोवेळी महागाईनुसार समायोजन करून त्या प्रमाणात शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे.शेतकऱ्याचे उत्पादन बाजार समितीत, बाजार समितीच्या बाहेर किंवा सरकारने खरेदी केले तरी घोषित केलेल्या फायदेशीर किमतीवर विकले जाईल, घोषित किमतीपेक्षा कमी किमतीस व्यवहार झाल्यास तो अपराध मानण्यात येईल.त्यासाठी कठोर कायदा बनवावा.शेतमालाला ‘उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमती’साठी कायदा करावा, अन्यथा भारतीय किसान संघ प्रायव्हेट मेंबर बिलच्या माध्यमातून संसदेत कायदा बनविण्याची प्रक्रिया सुरू करेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

या धरणे आंदोलनात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलक शेतकऱ्यांना भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर बडगुजर,महामंत्री वैभव महाजन,प्रांत कार्यकारणी सदस्या कपिलाताई मुठे,जिल्हा जैविक शेती प्रमुख डॅा.दीपक पाटील (एरंडोल) यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर बडगुजर,उपाध्यक्ष शिवराम महाले, कपिला मुठे,डॅा.दिपक पाटील, वैभव महाजन,रवींद्र पाटील,प्रभाकर पाटील, रतिलाल कोळी, सतिष पाटील अमळनरे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पत्रकार श्रीकांत नेवे,भगवान न्हायदे,चोपडा, अमोल पाटील, प्रेमचंद भारंबे,अनुप पाटील, प्रतिक पाटील, मयूर पाटील, स्वप्नील पाटील, प्रमोद महाजन, श्रीकांत श्रीखंडे रावेर,अॅड.दिपक शिंदे जळगाव,उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here