नंदुरबार : प्रतिनिधी
राकसवाडे येथे ग्रामस्थांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या प्रसादातून १३४ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधेमुळे अनेकांना उलट्या आणि काहींना जुलाबचा त्रास जाणवू लागला. मात्र, उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून ४० जणांवर राकसवाडे आरोग्य केंद्रातच उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी राकसवाडे येथेच तळ ठोकून आहेत.
काल महाशिवरात्रीनिमित्त राकसवाडे येथे ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद वाटपानंतर काही ग्रामस्थांना सायंकाळी उलट्या होऊ लागल्या. हळूहळू उलट्या होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. यामुळे अनेकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. उलट्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रसादातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.