चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव नगरपालिकेच्या दर्ज्याहीन विकासकामांची नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी दखल घेतली असून त्यांनी गुणनियंत्रण सक्षम अधिकारी यांच्या मार्फत सर्व कामाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
चाळीसगाव बचाव कृती समिती ने दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, गत वर्षी अतिरिक्त पर्जन्यमान असल्यामुळे शहरात सर्वत्र खड्डे आणि धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे. वाढीव पाणीपुरवठा योजना गेल्या 36 ते 40 महिन्यापासून काम सुरू आहे. त्यात मलनिस्सारण योजना कार्यरत असल्याने रस्ते करण्यास तांत्रिक अडचण शासन स्तरावर निर्माण झाली आहे. ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले असते तर शहरातील नागरिकांचे हाल टाळता आले असते. त्यात कामात निकृष्ट दर्जा असल्याने भविष्यात योजना किती योग्य पद्धतीने सुरू राहणार की शहरातील नागरिकांचे प्रत्येक योजनेत 10 % हिस्सा वाया जाणार असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले असून प्रशासनाने कामाची गुणवत्ता आणि काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याने सुस्त प्रशासन झोपेतून जागे करणे प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.