कृउबात कामगाराचा गळफास

0
2

जळगाव : प्रतिनिधी
येथील कांचन नगर येथील रहिवासी इसमाने 2 मार्च बुधवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदान शिलाईच्या कामावर असताना गळफास घेतला. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रमेश सुकलाल राजपूत (वय 48, रा.कांचन नगर) असे मयत इसमाचे नाव आहे. रमेश राजपूत यांचा 13 वर्षीय मुलगा यश याने मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी रोजी क्षुल्लक कारणावरून गळफास घेतल्याची घटना घडली होती. या घटनेपासून मयत यशचे वडील रमेश हे तणावात असल्याचे मित्रांनी व कुटुंबीयांनी सांगितले.
बुधवारी 2 मार्च रोजी नेहमीप्रमाणे रमेश राजपूत हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरत प्रजापत यांच्या दुकानामध्ये बारदान शिलाईच्या कामासाठी गेले होते. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते या ठिकाणी काम करत आहेत. सकाळी अन्य कर्मचाऱ्यांसोबत शिलाईसाठी बारदान त्यांनी काढले.
त्यावेळेला “मला जरा बरे नाही वाटत, मी आत जाऊन झोपतो” असे म्हणून रमेश राजपूत हे दुकानाच्या आत मध्ये गेले. बाकी कर्मचारी हे बाहेर बसून बारदान शिलाई करीत होते. काही वेळाने कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, रमेश राजपूत हे बऱ्याच काळापासून बाहेर आले नाहीत. त्यांनी आत जाऊन बघितले असता, रमेश राजपूत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तातडीने कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरविले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. रमेश राजपूत हे अत्यंत मेहनती आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here