जळगाव ः प्रतिनिधी
मनपाकडून कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता आकृतीबंध मंजूर होईपर्यंत मानधनावर नियुक्ती केली जाणार आहे. त्यात संधी देताना लेखापरीक्षणात आक्षेप असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संधी देण्यात येऊ नये अशी मागणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली आहे.
महानगरपालिकेत सध्या अभियंत्यांसह तांत्रिक कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. सेवानिवृत्तांचे प्रमाण अधिक असल्याने अनुभवी कर्मचाऱ्यांअभावी कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे येत्या महासभेत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मानधनावर घेण्याचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. असे करताना ज्या कर्मचाऱ्यांवर उड्डाण पदोन्नतीअंतर्गत आक्षेप आहेत. तसेच यापुर्वी ज्यांच्यावर कारवाई झाली असेल अशा कर्मचाऱ्यांना सेवेत संधी देऊ नये अशी मागणी नाईक यांनी केली आहे. त्यानंतही अशी नियुक्ती झाल्यास पालिकेत मनपाच्या कारभाराचा अनुभव असलेल्या माजी पदाधिकाऱ्यांना मानधनावर सामावून घ्यावे असा खोचक टोला प्रशांत नाईक यांनी लगावला आहे.