साहित्यिकांनी ‘टुल किट’ सारखे काम करावे- डॉ. भालचंद्र नेमाडे

0
5

जळगाव : प्रतिनिधी
साहित्यिकांनी नुसतेच लेखक म्हणून नव्हे तर नाविन्य शोधून समाजात ‘टुल किट’ सारखे काम करावे, जसे आहेत तसेच व्यक्त व्हावे अनन्यसाधारणत्व, युनिकपणा लेखकात असावा अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली.
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा द्विवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे आहे. लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी श्रीमती सुमती लांडे, (श्रीरामपूर), कवी म्हणून बालकवी ठोंबरे पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सीताराम सावंत यांना (इटकी, जि. सातारा) यांना वितरण करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रूपये, सन्मानचिन्ह आणि ग्रंथसंपदा होय. सर्व पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्य हस्ते प्रदान करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र नेमाडे उपस्थित होते. व्यासपीठावर संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, बहिणाबाई चौधरी मेमोरीयल ट्रस्टच्या विश्वस्त सौ.ज्योती जैन, भवरलाल ॲण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. निशा जैन व पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. जैन हिल्स परिसरातील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात पुरस्कार सोहळा झाला.
यावेळी कविवर्य स्व. ना. धों. महानोर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शंभु पाटील यांनी भवरलालजी जैन आणि ना.धों. महानोर यांच्या मैत्रीचा पट उलगडला. प्रास्ताविक श्रीकांत देशमुख यांनी केले. चारही पुरस्कार विजेत्यांच्या परिचयात्मक डॉक्यूमेंट्री दाखविण्यात आल्या. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
बहिणाई यांचे साहित्य जगाला दिशादर्शक होते त्यांच्या नावाने दिला जाणारा निर्मळ पुरस्कार आहे. पर्यावरणदृष्टी असलेल्या वातावरणात जैन परिवाराने जपलेला निसर्गाच्या सान्निध्यातील कृतज्ञतापूर्वक सोहळ्यात हा पुस्कार दिल्याने आनंद आहे. बहिणाबाईंच्या नावाने पुरस्कार मिळणे मोलाचे असल्याचे सुमती लांडे सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या.
जीवनाला कलंकीत करणाऱ्या विकृतींवर हल्लाबोल करण्याचे काम लेखक, कवी आणि विचारवंत करतात. आजूबाजुला घडणाऱ्या प्रसंगाचा विचार करताना असेच का? या प्रश्नाचा शोध कवी सतत घेतो, चालताना तो कोलमडतो तेव्हा त्याला असे काही चांगले पुरस्कार, सन्मान हात धरुन उभे करतात. या पुरस्कारामुळे नवी उमेद येते व तो नव्या जोमाने चालू लागतो. भवरलाल ॲण्ड कांताबाई फाउंडेशनचे ऋण व्यक्त करून बालकवी ठोमरे पुरस्काराचा मी स्वीकार करत आहे असे अशोक कोतवाल यांनी व्यक्त
केले.
सध्या कॉक्रीटच्या जंगलामुळे उपजावू जमिनी कमी होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे बिल्डर, विकासक आहेत. ते अशा पिकाऊ भूईला नष्ट करत आहेत. हे ‘भुई भुई ठाव दे’ या कादंबरीमध्ये मांडले आहे. आज शब्दांच्या माध्यमातून सांकृतिक, वैचारिक प्रदूषण होत आहे. महात्मा गांधीजींसारख्या महान व्यक्तीमत्त्वाला शिक्षीत समाज गांधी वध म्हणत असतो. जैन हिल्ससारख्या बरड जमिनीत जिथे कुसळही उगवत नव्हते तिथे भवरलाल जैन यांनी नंदनवन उभे केले त्यामुळे हा पुरस्कार मानवतेच्या दृष्टीने अनमोल असल्याचे सीताराम सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here