साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर ।
शहरात होणारा पिण्याचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसांवर होत आहे. तसेच नळाला येणारे पाणी अस्वच्छ असून मानवी आरोग्यास हानिकारक आहे. त्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात यावे, अशा मागणीसाठी शहरातील विविध परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढून निषेध व्यक्त करीत निवेदन देण्यात आले.
गत काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा संपूर्ण विस्कळीत झालेला आहे. १० ते १५ दिवसांवर शहराला नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर नळाद्वारे येणाऱ्या पाणीमध्ये विविध जिवाणू , कीटक निघत आहे. मानवी आरोग्यास हानिकारक अशा प्रकारचे पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना योग्य मूलभूत सुविधा देण्यासाठी नगरपालिकाही असमर्थ दिसून येत आहे. या विषयाला हेरत शहरातील छत्रपती शिवाजीनगर, तथा विविध परिसरातील महिला व पुरुषांनी २४ जून रोजी तहसील कार्यालयापासून तर नगर परिषदेपर्यंत मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना संबंधित समस्यांवर तात्काळ उपायोजना व्हाव्यात, अशा आशयाचे निवेदन देत नगरपालिकेचा निषेध व्यक्त केला.
निवेदनावर मा. नगरसेवक राजेंद्र वाडेकर, पंकज जगताप, दुर्गेश राजापुरे, गणेश जंजाळकर, यशवंत थोरबोले, अक्षय कदम, आदित्य देवकर, दीपक मुंजाळ, मंगेश अमराळे, यांच्यासह बहुसंख्य महिलांसह पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
