साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरात शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी रात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने मेहरुणमधील रामेश्वर कॉलनी येथे अंबरधऱ्याचे पाटचारीमधून पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाणी बांधावरून नागरिकांच्या घरात शिरल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी रविवारी त्याठिकाणी तातडीने भेट देऊन २ जेसीबी, १ पोकलँड मशीन लावून पाण्याच्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबींचा निचरा करून पाणी वाहून जाण्यासाठीची व्यवस्था तातडीने प्रशासनामार्फत करण्यात आली. तसेच काव्यरत्नावली चौक, हॉटेल रॉयल पॅलेस समोरील चोकप, स्मित कॉलेज मार्ग याठिकाणी अडलेल्या पाण्याची वाहून जाण्याची वाट ‘व्हॅक्यूम एम्पिटर’द्वारे मोकळी करून देण्यात आली.
तसेच द्वारका नगर येथील रहिवासी नागरिकांनी प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना तक्रार दिली. त्यानंतर त्यावर कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाय योजनेचा प्रस्ताव मंजूर आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम हाती घेण्यात येईल, असे नागरिकांना सांगण्यात आले. यावेळी सह आयुक्त गणेश चाटे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील, आरोग्य निरीक्षक कांबळे, श्री. किरंगे यांच्यासह अधिकारी, कामगार वर्ग उपस्थित होते.