साईमत, वरणगाव : प्रतिनिधी
येथील पोलीस ठाण्यात अपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांमुळे नियुक्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताण पडतो. तसेच शहरासह परिसरातील गावातील कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने पोलीस ठाण्यातील रिक्त जागांवर त्वरित पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
वरणगाव शहराचा दिवसेंदिवस वाढत असलेला नागरी वस्तीचा विस्तार तसेच शहराला लागून असलेल्या २७ खेडेगावातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी वरणगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. मात्र, पोलीस ठाण्यात किमान ३३ पोलीस कर्मचारी आवश्यक असतांना केवळ १८ पोलीस कर्मचारी बांधवांना वरणगाव शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक यांचा समावेश असल्याने पोलीस ठाण्यातील रिक्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, शामराव धनगर, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील महाजन, संतोष पाटील, आकाश निमकर, डॉ. प्रवीण चांदणे, साबीर कुरेशी, गोलू राणे, नाना चौधरी, हितेश चौधरी, महिला मोर्चाच्या कस्तुराबाई इंगळे यांनी वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांना दिले. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, आ. संजय सावकारे, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे रवाना केल्या आहेत.
होमगार्डवर ‘मदार’ अवलंबुन
वरणगाव पोलीस ठाण्यातील अपूर्ण पोलीस संख्याबळ पाहता पोलीस ठाणेअंतर्गत होमगार्ड यांची सण उत्सव व विविध जयंतीच्या वेळी शासन स्तरावरून मदत घेतली जाते. त्यामुळे वरणगाव शहरासह परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची मदार होमगार्ड पथकावर अवलंबुन आहे.