ट्रकचे ब्रेक फेल; दुर्घटनेतील जखमी रिक्षाचालकाचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी)-
छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलावरून जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उतारावरून मागे आला. त्यामुळे पुलाजवळ उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह पाच दुचाकींना धडक बसली. या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले यापैकी रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल (वय ५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२२ मार्चरोजी दुपारी सुरत रेल्वेगेटजवळ मालधक्क्यावरून सिमेंट भरून (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजीनगर उड्डाणपुलावरून जात होता. अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि ट्रक उतारावरून मागच्या बाजूने येऊ लागला. पूर्णपणे भरलेला ट्रक भरधाव रिव्हर्स येत अाल्याने त्याने तीन रिक्षा आणि पाच दुचाकींना चिरडले. यात राधाकृष्ण नगरातील रहिवासी रिक्षाचालक सुरेश जैस्वाल गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सुरेश जैस्वाल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.