उत्कृष्ठ वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता व्हायला शिका

0
27

चाळीसगावातील महाविद्यालयात व्याख्यानात ॲड.मुकेश पवार यांचे प्रतिपादन

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

उत्तम बोलण्यासाठी शब्द सामर्थ्य वाढवा, त्यासाठी भरपूर वाचन करा. समाज माध्यमांच्या आहारी जाऊ नका. बोलण्यातूंचा पहिल्याप्रथम व्यक्तीचे व्यक्तिमत्व दिसून येते व व्यक्तीची ओळख होते. या महाविद्यालयाची मी विद्यार्थी राहिलो आहे. या महाविद्यालयानेच मला घडविले आहे. उत्कृष्ट बोलायला शिकले पाहिजे. उत्कृष्ठ वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता व्हायला शिका . चांगलं बोलायचं असेल तर चांगलं वाचायची सवय लावावी लागते. त्याचबरोबर स्पर्धेचे जीवनातील महत्व आणि विविध स्पर्धांमुळे जीवनाला मिळणारा आकार, यशाची हमी याबद्दलही मार्गदर्शन करुन आपल्या विचारांनी ॲड.मुकेश पवार यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स कॉलेज चाळीसगावच्यावतीने महाविद्यालयाच्या मेहता सभागृहात वादविवाद मंडळाचे उद्घाटन व विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. वादविवाद मंडळाचे उदघाटन पत्रकार तथा ॲड. मुकेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे ‘वक्तृत्व, वादविवाद कौशल्य’ विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. व्ही. बिल्दीकर हे होते.

अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा आणि तळमळीने भविष्याचा वेध घ्यायला हवा. प्रभावी बोलायला शिकले पाहिजे. अभ्यासाबरोबरच विविध कला कौशल्ये ही आत्मसात करायला हवीत. त्याकरिता अवांतर वाचन आणि विविध स्पर्धामध्ये सहभाग नोंदवावा ज्यातून व्यक्तिमत्व विकासासाठी मदत होईल, असा सल्ला दिला.

प्रास्ताविकात वादविवाद मंडळाचे समन्वयक डॉ. वीरा राठोड यांनी वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेबद्दल आणि विशेष व्याख्यानाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. उत्तम वक्तृत्व आदर्श व्यक्तिमत्वाचा उत्कृष्ट नमुना असतो आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व चांगले घडावे, म्हणून असे उपक्रम आयोजित करण्यात येतात, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अजय काटे, उप प्राचार्या डॉ.कला खापर्डे यांची विशेष उपस्थिती होती.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी वादविवाद मंडळाचे सदस्य प्रा.एम.ओ.अहिरे, डॉ.एस. एन. कावळे, प्रा.आर. एस. पाटील, प्रा.के डी. पाटील, प्रा.व्ही. पी. पाटील, रघुनाथ कोळी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन तथा प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.जोशी यांनी केला. आभार डॉ.मनीषा सूर्यवंशी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here