मुंबई ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे.राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसेने ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक सुरू केले आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोडही केली.यावरुन शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचले आहे.
आधी माणगाव…नंतर राजापूर आणि आता रत्नागिरी…मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत कंत्राटदार आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी मनसेने ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक आंदोलन सुरू केले.चंद्रावर जाऊन खड्डे पाहण्यापेक्षा महाराष्ट्रातच खड्डे पाहा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता.एकीकडे राज्यात गतीमान सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्री वारंवार करतायेत मात्र दुसरीकडे खड्ड्यांमुळे जिकडे-तिकडे वाहतूक मंदावल्याची वास्तव आहे.
दीपालीला सय्यद यांचा टोला
मनसेच्या या आंदोलनावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी, राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम,उगाच जेलमध्ये महिनाभर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पण! युवा नेत्यांना घराबाहेर काढुन कामाला लावा! , असे दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.