नागरिक त्रस्त, आरोग्यावरही धोकादायक परिणाम
साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी:
शहरातील खडका चौक परिसरातील कॉलन्यांमध्ये नागरिकांचे जीवन अक्षरशः कठीण बनले आहे. गॅलेक्सी हॉटेलच्या मागील भागातील आयान कॉलनी, जिया कॉलनी, अली रजा कॉलनी, फातिमा कॉलनी आणि हलीमा मस्जिद कॉलनीमध्ये कचरा, नाली आणि रस्त्यांच्या समस्येमुळे परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, अनेक वेळा भुसावळ नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन दिले असतानाही अद्याप मूलभूत समस्या कायम आहेत. घरगुती कचरा, प्लास्टिक, अन्नाचे उरलेले पदार्थ यांसारखा कचरा मोठ्या प्रमाणावर साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेची फिरती कचरा गाडी नियमित येत नसल्यामुळे नागरिकांना खुल्या जागेत कचरा टाकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
साचलेल्या कचऱ्यामुळे माशा, डास आणि इतर कीटकांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, कॉलरा, अतिसार आणि त्वचारोग यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. येणाऱ्या पावसाळ्यात नाल्यांची योग्य व्यवस्था नसल्याने पाणी साचण्याची समस्या अधिक तीव्र होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सध्या परिसरात नाल्यांची सुविधा नसल्यामुळे काही नागरिकांना आपल्या घरासमोर खड्डे करून त्यामध्ये सांडपाणी सोडावे लागत आहे. परिणामी दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना रोजच्या ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रमजान महिन्यातही समस्या कायम
मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असतानाही या कॉलन्यांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी आश्वासने दिली असली तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
शाळकरी मुलांची आरोग्याची चिंता
एमआय तेली इंग्लिश स्कूल या परिसरात असल्यामुळे शहरासह आसपासच्या गावांमधून अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पालक आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी
“स्वच्छता राखण्याची जबाबदारी आम्हीही घेण्यास तयार आहोत, मात्र आमच्याकडे रस्ता नाही, नाली नाही आणि कचरा उचलण्यासाठी गाडीही येत नाही. मग स्वच्छता कशी राखायची?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक नागरिकांची जोरदार मागणी आहे की, भुसावळ नगरपरिषद प्रशासनाने खडका चौक परिसरातील रस्ते, नाली आणि कचरा व्यवस्थापनाची कायमस्वरूपी व्यवस्था तातडीने करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
