भुसावळ, अट्रावल-मुंजोबा, आमोदा-बामनोद व बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर अपघाताची भीती
साईमत /यावल /प्रतिनिधी
तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिक, वाहनचालक आणि भाविकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. यावल-भुसावळ रस्ता ५ किलोमीटर लांब असून, त्यावर डागडुजीची कामे १५ दिवसांपूर्वी सुरू केली होती. मात्र, अंजाळे गावाजवळील शनी मंदिराजवळील एक ते दीड किलोमीटर रस्ता ठेकेदारांनी अद्याप दुरुस्त केलेला नाही. या भागातील खोल खड्ड्यांमुळे मोटरसायकल आणि वाहनधारकांसाठी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
यावल-भुसावळ रस्त्याच्या बांधकामात सिमेंट काँक्रीट वापरण्यात आले असले तरी काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खोल दऱ्या निर्माण झाल्या आहेत. ज्यामुळे वाहन चालवताना गंभीर धोका निर्माण होतो. नागरिक आणि वाहनचालक प्रशासन आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे त्रस्त आहेत.त्याचप्रमाणे आमोदा-बामनोद रस्त्याच्या बांधकामाच्या आजूबाजूने गरज नसतानाही बेसुमार वृक्षतोड करण्यात येत आहे. रोडच्या सेंटरपासून १५ मीटर अंतरावर वृक्षतोड करण्याचे नियमन असूनही अधिक अंतरावर वृक्षतोड केल्यामुळे वन, बांधकाम व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्यावरही अनावश्यक वृक्षतोडीची मोठ्या प्रमाणावर नोंद आहे.
तालुक्यातील नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची नाराजी वाढत असून, स्थानिक लोकांना रस्त्यांची दयनीय अवस्था आणि वृक्षतोडीचा धोका स्पष्टपणे दिसत असूनही अधिकारी अद्याप कारवाई करत नाहीत, असा आरोप उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार हे डागडुजीसाठी आवश्यक साहित्य असूनही काम का उशिर करत आहेत. तसेच यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अट्रावल-मुंजोबा रस्ता आणि अंजाळे येथील शनी मंदिर मार्ग अत्यंत खराब असून दर सोमवारी व शनिवारी हजारो भाविक या रस्त्यांवरून यात्रा करतात. धुळे, अमळनेर, शिरपूर, चोपडा, जळगाव, ममुराबाद, विदगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, फुलगाव व वरणगाव इत्यादी परिसरातील हजारो भाविक अट्रावल मुंजोबाचे दर्शन घेण्यासाठी येतात.
रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था विचारात घेतल्यास भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.स्थानिक नागरिकांचा असा विश्वास आहे की, अट्रावल-मुंजोबा आणि अंजाळे-शनी मार्गावरील निष्क्रियता तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष भविष्यातील ग्रामस्थांच्या मतदानावर प्रभाव टाकू शकते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि महसूल विभाग तातडीने कार्यवाही करावी आणि रस्त्यांचे डाग-डुजी तसेच अनावश्यक वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या गंभीर परिस्थितीचा आढावा घ्यावा. अन्यथा, भाविक आणि स्थानिक नागरिक पुढील निवडणुकांमध्ये निष्क्रियतेस कठोर फटका देऊ शकतात, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
