The Navapur Sports Ground : नवापुरला क्रीडा मैदानाला अतिक्रमणाचा विळखा अन्‌ दुरवस्था चिंताजनक

0
8

नागरिकांसह क्रीडाप्रेमींमध्ये संताप, न.पा.च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

साईमत/नवापूर/प्रतिनिधी :

कधीकाळी क्रिकेटपटूंच्या आवाजाने गजबजलेले आणि नवोदित खेळाडूंना घडवणारे नवापूर शहरातील दिगंबर पाडवी क्रिकेट मैदान आज केवळ अतिक्रमणाचा विळखा आणि प्रशासकीय दुर्लक्षाचे बोलके उदाहरण बनले आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेली खेळाडूंची इमारत आता भग्नावस्थेत आली आहे. तिचा वापर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आणि जुगार खेळणाऱ्यांचा अड्डा म्हणून होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मैदानाची झालेली दुरवस्था पाहून स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, नवापूरचे एकमेव क्रिकेट मैदान आता अतिक्रमणाने ग्रस्त झाले आहे. तसेच लाखो रुपये खर्चून उभारलेली इमारत आज केवळ इमारत खंडर बनली असल्याची स्थिती आहे.

नवापूर शहरातील दिगंबर पाडवी क्रिकेट मैदान हे तालुक्यातील एकमेव क्रिकेट मैदान आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने तत्कालीन खा.हिना गावित यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात येथे खेळाडूंसाठी अद्ययावत इमारत बांधण्यात आली होती. मात्र, उद्घाटनानंतर काही वर्षांतच इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. इमारतीमधील खिडक्या, दरवाजे, विद्युत उपकरणे आणि इतर सर्व किमती वस्तू चोरीला गेल्या आहेत. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात इथे असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. दारू पिऊन धिंगाणा घालणे, जुगार खेळणे अशा गोष्टी इथे सर्रास सुरू असतात. ही इमारत आता अक्षरशः ‘खंडर’ बनली आहे. तिचा मूळ उद्देश पूर्णपणे हरवला आहे.

नगरपालिकेचे दुर्लक्ष चव्हाट्यावर

एकेकाळी मोठ्या क्रिकेट स्पर्धांचे केंद्र असलेले मैदान आज ओळखणेही कठीण झाले आहे. त्याठिकाणी सर्वत्र घाणीचे ढिगारे साचले आहेत. त्याठिकाणी प्लास्टिक कचरा आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. मैदानावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. काही ठिकाणी तात्पुरती बांधकामेही उभी राहिली आहेत. त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी जागाही शिल्लक राहिलेली नाही. स्थानिक नागरिकांचा थेट आरोप आहे की, नवापूर नगरपालिकेने मैदानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अशा गंभीर समस्येकडे कानाडोळा केला आहे. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पाची अशी दुरवस्था होणे, हे प्रशासनाच्या उदासिनतेचे आणि निष्क्रियतेचे द्योतक आहे.

खेळाडूंचे भवितव्य धोक्यात

नवापूर तालुक्यात एकमेव क्रिकेट मैदान आहे. त्यामुळे येथील युवा क्रिकेटपटूंना सराव करण्यासाठी दुसरी कोणतीही पर्यायी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे. यासोबतच मैदानाची झालेली ही वाताहत अनेक खेळाडूंची स्वप्ने मोडून काढत आहे. पूर्वी याच मैदानावर मोठे-मोठे क्रिकेट सामने रंगायचे. मात्र, आज येथे केवळ अस्वच्छता आणि अतिक्रमण वाढले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवापूरच्या क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दिगंबर पाडवी मैदानाचे पुनरुज्जीवन करावे.त्याला पुन्हा खेळाडूंसाठी उपयुक्त बनवावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा, भविष्यात नवापूरला एकही क्रिकेट मैदान उरणार नाही, अशी भीती क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here