ग्रामपंचायत प्रशासनाचा बेफिकीर कारभार
साईमत/सावदा, ता. रावेर/प्रतिनिधी :
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बु.येथील ग्रामपंचायतीच्या जीर्ण झालेल्या जलकुंभाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. जलकुंभ अतिशय जीर्ण झाला आहे. जलकुंभावरील छताचे ढेकळी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष जलकुंभ कधी ढासळेल आणि प्राणहानी, जीवितहानी होईल, हे सांगताच येत नाही. हा जलकुंभ मोठा वाघोदा येथील बसस्थानक परिसरात आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी आहे. जलकुंभाखाली १० व्यावसायिक दुकानांचे गाळे असलेले व्यापारी संकुल, पान टपरी आहे आणि याच व्यापारी संकुलात व्यावसायिकांच्या दुकानात नेहमीच ग्राहकांची गर्दी, सतत नागरिकांची वर्दळ असते. कदाचित अचानक हा जलकुंभ ढासळला तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जीर्ण जलकुंभाबाबत ग्रामपंचायतीकडे ग्रामसभेत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात वर्षभरापासून वृत्तपत्रांमधून वृत्त प्रकाशित झाल्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने जलकुंभ पाडण्यासाठी ठराव मंजूर केला होता. जलकुंभाजवळील परिसरात वापरण्यासाठी बंदीची नोटीस लावण्यात आली. मात्र, नक्की घोडे अडले कुठे? म्हणूनच तर अद्यापही हा जलकुंभ पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला मुहूर्त सापडलेला नाही. काहीही सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट चित्र सध्या तरी दिसत आहे.
जीर्ण जलकुंभाची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळ्यात हा अतिशय जीर्ण जलकुंभ कोसळण्याची दाट शक्यता आहे. ती नाकारताही येणार नाही. तरीही ग्रामपंचायत प्रशासन निष्क्रिय तसेच निश्चिंत बेफिकीर परिस्थितीत ‘नो’ टेन्शन दिसते? ग्रामपंचायत प्रशासन जलकुंभाची पाण्याऐवजी आपोआप कोसळण्याची वाट बघतेय का? तसेच जलकुंभाची पडझड अथवा ढासळून जीवितहानी होण्याची वाट बघतेय का ? म्हणून जीर्ण जलकुंभामुळे वाईट अप्रिय घटना घडू नये. याकरिता तातडीने जलकुंभ पाडण्यासाठी जमीनदोस्त करण्याची तसदी ग्रामपंचायत प्रशासन घेईल का? रावेर पंचायत समितीत अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी पदावर नुकतेच रुजू झालेले गटविकास अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जीर्ण जलकुंभाबाबत तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.