पुढील आठवड्यात होणार ‌‘त्या‌’ आमदारांचा फैसला

0
15

साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रता मुद्यावर सुनावणी घेण्यास विलंब होत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर पुन्हा कामाला लागले आहेत. त्यांनी दिल्लीत जावून तेथील कायदेतज्ज्ञांशी या प्रकरणी चर्चा केली आहे. पुढील आठवड्यात सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना स्पष्ट सांगितले.

राहुल नॉर्वेकर गुरुवारी दुपारी नवी दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांच्या दौऱ्याबाबत वेगवेगळ्या अटकळी सुरू झाल्या. त्यातच राहुल नॉर्वेकर यांनी स्वतः शुक्रवारी दिल्लीत आपण कुणाला भेटलो व त्यात नेमकी कोणती चर्चा झाली याचे स्पष्टीकरण दिले. माझी काही कायदेतज्ज्ञांशी चर्चा झाली. एकूणच अपात्रतेचा विद्यमान कायदा बदलत जाणारा आहे. या कायद्यात परिस्थितीनुरुप बदल होतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आलेले आदेश किंवा या कायद्यात आणखी काय दुरुस्ती करण्याची गरज आहे अथवा या कायद्याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणे आवश्यक आहे आदी अनेक मुद्यांवर माझी विविध तज्ज्ञांशी चर्चा झाली.

सुप्रीम कोर्टाने आम्हाला एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्याचे निर्देश दिलेत. तशी आमची सुनावणी १४ सप्टेंबर रोजी झाली आहे. आमची पूर्वनियोजत सुनावणीही होतीच. त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन निर्णय घेऊ, असे राहुल नॉर्वेकर म्हणाले. या प्रकरणी गरज पडली तर पक्षाच्या प्रमुखांनाही बोलावण्यात येईल, असे नमूद करत विधानसभा अध्यक्षांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलावण्यासंबंधी सूचक विधान केले.

विधान परिषदेतील तीन आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गट सुप्रिम कोर्टात जाणार

विधान परिषदेतील आमदारांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीस विलंब होत असल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. शिवसेनेचे (ठाकरे) प्रतोद अनिल परब यांनी उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार मनीषा कायंदे व आमदार विप्लब बजोरिया यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. या ३ आमदारांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवालयाकडे केली आहे.

तथापि, या याचिकेसंबंधी मोठा पेच निर्माण झाला आहे. विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. याप्रकरणी थेट निलम गोऱ्हे यांचे नाव घेण्यात आले आहे. गोऱ्हे स्वतः उपसभापती आहेत. त्यामुळे त्यांनाही या याचिकेवर सुनावणी करता येणार नाही. त्यामुळे आता या प्रकरणावर कोण सुनावणी घेणार? असा कळीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच आता याचिकेवर सुनावणी घेण्यास विलंब होत असल्यामुळे ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे. यामुळे हे प्रकरण अधिकच क्लिष्ट बनले आहे.

अजित पवार गटाची तक्रार आली का?

पत्रकारांनी यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून काही तक्रार आली आहे का? असा थेट प्रश्न करण्यात आला. त्यावर राहुल नॉर्वेकरांनी राष्ट्रवादीकडून यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या याचिकांचीच आपल्याला माहिती असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here