साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मुडी-बोदर्डे येथील शेतकऱ्याच्या सुमारे तीन बिघे शेतीतील कपाशी समाजकंटकाने उपटून फेकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, अमळनेर तालुक्यातील मुडी-बोदर्डे येथील शेतकरी देविदास पाटील यांच्या शेतातील काही समाजकंटकांनी त्यांच्या तीन बिघे शेतात कापसाचे दोनशे ते तीनशे झाडे उपटुन फेकले आहेत. याबाबत शेतकरी देविदास पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनाला तक्रार दिली आहे. परंतू शेतात अद्यापही कोणतेही शासकीय अधिकारी पंचनाम्यासाठी पोहोचलेले नाहीत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, नुकसानीचा शासकीय पंचनामा करून त्यांना तात्काळ राज्य शासनातर्फे मदत मिळावी, अशी मागणी परिसरातून हेोत आहे.