Pimple Saudagar’s Assertion Of Bharat Sasane : आधुनिक साहित्याचा ‘विश्व करुणा’ गाभा : पिंपळे सौदागरला भारत सासणे यांचे प्रतिपादन

0
7

‘स्मृतिशेष चमेली भाऊराव कादंबरी’ पुरस्काराने प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे सन्मानित

साईमत/पुणे-जळगाव/प्रतिनिधी :

आधुनिक साहित्याचा ‘विश्व करुणा’ हा गाभा आहे. तो भाव ‘चिंबोरे युद्ध’ कादंबरीत प्रतीत होत असल्याचे प्रतिपादन ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे लिखित यांना जळगाव येथील अथर्व पब्लिकेशने प्रकाशित केलेल्या ‘चिंबोरे युद्ध’ कादंबरीला जळगाव येथील स्मृतिशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठानच्यावतीने ‘स्मृतिशेष चमेली भाऊराव कादंबरी’ पुरस्काराने सन्मानित करताना ते बोलत होते. ‘पुरस्कार आपले दारी’ अशा अभिनव उपक्रमाने प्रतिष्ठानतर्फे कादंबरीकार प्रा.डॉ.लबडे यांच्या पुणे येथील पिंपळे सौदागर येथे घरी जाऊन पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे यंदा राज्य पुरस्काराचे दुसरे वर्ष होते. याप्रसंगी ज्येष्ठ अनुवादक प्रा. डॉ. विलास साळुंखे, लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान खुडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, पितांबर लोहार, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, स्वाती लबडे, चमेली भाऊराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत हिंगोणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठीतील कादंबरी लेखन हे रंजनात्मक, कलात्मक, वास्तववादी, अतिवास्तववादी अशा टप्प्यातून जात असताना जागतिकीकरणामुळे त्यात प्रतीकात्मकतेचा अवलंब करण्यात येत आहे. लबडे यांच्या कादंबरीच्या लेखनातील प्रायोगिकता वैश्विक पातळीवरची असल्याने त्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल, असेही भारत सासणे म्हणाले. तसेच इंग्रजी जागतिक स्तरावरील भाषा असल्याने बाळासाहेब लबडे यांचे सर्व लेखन अनुवादित होण्याची गरज असल्याचे प्रा. डॉ. विलास साळुंखे यांनी सांगितले. अभिजात भाषा ही अभिजनांपुरती आहे. लोकसाहित्य अजूनही उपेक्षित असल्याची खंत सोपान खुडे यांनी व्यक्त केली. यावेळी पितांबर लोहार यांनी बाळासाहेब लबडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले.

प्रतिष्ठानतर्फे साहित्यकृतींचा शोध घेऊन होतोय गौरव

प्रास्ताविकातून शशिकांत हिंगोणेकर यांनी आई-वडिलांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात म्हणून प्रतिष्ठानच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतींचा शोध घेऊन त्यांचा मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते यथोचित गौरव करण्याचा उपक्रम गेल्या वर्षापासून सुरू केल्याची माहिती दिली. पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर तर सुरेश कंक यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here