जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
उत्तरकाशीमध्ये घडलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर जळगाव जिल्ह्यातील १९ भाविक अडकले आहे. त्यात विविध तालुक्यांतील नागरिकांचा समावेश आहे. अशा भाविकांपैकी केवळ तीन जणांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. त्यापैकी उर्वरित १६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उत्तरकाशी येथे काही दिवसांपूर्वी अचानक भूस्खलन व मुसळधार पावसामुळे काही रस्ते पूर्णतः बंद झाले. ज्यामुळे अनेक भाविक अडकल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील १९ जण अडकल्याचे समोर आले आहे. त्यात जळगाव शहरातील तीन, पाळधी गावातील १३, धरणगाव येथील दोन आणि पाचोरा येथील एका जवानाचा समावेश आहे. जळगाव शहरातील आयोध्या नगरमधील मेहरा कुटुंबातील तिघांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाल्याचे समजते. मात्र, इतर १६ जणांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
विशेष बाब म्हणजे अडकलेल्या भाविकांमध्ये राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातील १३ जणांचा समावेश आहे. त्यामुळे ही घटना अधिक गंभीर झाली आहे. दरम्यान, पाचोरा येथील जवान सोपान अहिरे हे अडकल्यांमध्ये आहे. त्यांची चिंता स्थानिक पातळीवर अधिक वाढली आहे. धरणगावमधील दोन जण आणि इतर तालुक्यातील भाविकांनी उत्तरकाशीत यात्रा करण्यासाठी प्रयाण केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेनंतर तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्याचे विविध प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन सोशल मीडियासह स्थानिक पोलीस आणि इतर यंत्रणांच्या साहाय्याने तपशील जमा करत आहे. अडकलेल्या नागरिकांचे नावे, संपर्क क्रमांक आणि प्रवासाचा तपशील संकलित करून राज्य शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी सतत समन्वय साधण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
