भविष्यात होणाऱ्या राज्य परिषदेच्या आयोजनाची केली घोषणा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्यावतीने नवीन बसस्थानकाजवळील एका हॉटेलात बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या पुढाकाराने झालेल्या समाजाच्या भविष्यातील वाटचाल, एकजुटीवर चर्चा करण्यात आली. बैठकीत विजय चौधरी यांनी समाजबांधवांशी संवाद साधत समाजाचा विकास आणि परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. बैठकीला स्थानिक पंचमंडळ ३५०, महासंघाचे पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.
बैठकीत भविष्यात राज्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. ही राज्य परिषद समाजाच्या परिवर्तनासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी व्यासपीठ ठरेल. जुन्या रूढी आणि परंपरांकडे लक्ष देऊन त्यात काळानुरूप बदल घडविण्यावर भर दिला जाईल. आगामी राज्य परिषदेत विविध भागातील १ लाखांहून अधिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी महासंघाचे जळगाव जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांचा, पंचमंडळ अध्यक्षांचा विजय चौधरी, दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यांची लाभली उपस्थिती
बैठकीला उपाध्यक्ष विनोद चौधरी, अॅड. वसंत भोलाणे, सेवा आघाडी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बी.एम. चौधरी, नंदू चौधरी, सिताराम देवरे, अनिल चौधरी, अशोक चौधरी, प्रशांत शिंदे, प्रशांत सुरळकर, शामकांत चौधरी, अशोक नामदेव चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनिल चौधरी-पाटील तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.



