कवलीला घडली घटना, गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील कवली गावातील ५८ वर्षीय महिलेचा डेंग्यू सदृश तापाने छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोग्य विभागाने ताप रुग्ण सर्वेक्षण करून दोन रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे.
कवली गावात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे तापाची रुग्ण आढळून येत असताना गावातील अंजनाबाई सुकलाल अहिर (वय ५८) यांना (दि १२) किरकोळ तापाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पिंपळगाव (हरे.), शेंदुर्णी येथे खासगी उपचार करण्यात आले. मात्र त्यांचा ताप नियंत्रणात येत नसल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, ताप अधिकच वाढल्याने त्यांची रविवारी रात्री उपचारदरम्यान प्राणज्योत मावळली. घटनास्थळी आरोग्य विभागाच्या पथकाने तापाचे रुग्ण सर्वेक्षण करण्यात येत आहे. पहिले ताप रुग्ण सर्वेक्षण (दि.१३) केले आहे. त्यामध्ये किरकोळ तापाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याचे आरोग्य पथक प्रमुख विजय पंडित यांनी सांगितले.
गावात पुन्हा तापाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश
गावात कोणतीही तापाची सध्या साथ नसून सर्वेक्षण सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गितेश चावडा यांनी सांगितले. याप्रकरणी गावात पुन्हा तापाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल वारंगणे, डॉ.विशाखा डुकरे, आरोग्य सहायक विजय पंडित आदींनी तातडीने सर्वेक्षण हाती घेतले आहे. आरोग्य विभागाचे पथक गावात तळ ठोकुन आहे.
आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीला दिले पत्र
गावात स्वच्छता व डासांचा नायनाट करण्यासाठी धूळ फवारणीबाबत तालुका आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे. दरम्यान, डेंग्यूच्या तापाने मृत झालेल्या महिलेवर सोमवारी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.