विद्यार्थ्यांकडून मारहाण झाल्याचा पालकांनी केला आरोप
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील आर.आर.विद्यालयात खेळत असताना नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अचानक जमिनीवर पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, ११ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५, रा. कठोरा, जि. बुलढाणा, ह.मु. कासमवाडी, जळगाव) असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कल्पेशच्या आई-वडिलांनी इतर विद्यार्थ्यांकडून त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.
सविस्तर असे की, शहरातील कासमवाडीत कल्पेश इंगळे हा विद्यार्थी आई-वडील, बहीण आणि लहान भावासोबत वास्तव्याला होता. तो ११ जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. शाळेच्या मधल्या सुट्टीत दुपारी तीन वाजता जेवणासाठी सुट्टी झाली होती. तेव्हा तो विद्यार्थ्यांसोबत खेळत होता. तेव्हा तो अचानक जमिनीवर कोसळल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली. दरम्यान, त्याला शिक्षकांनी उचलून तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. यावेळी कल्पेशच्या आई-वडील, भाऊ यांनी एकच आक्रोश केला होता.
मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबियांचा पवित्रा
कल्पेश सकाळी शाळेत गेला तेव्हा चांगला होता. त्याचा दोन दिवसांपूर्वीही वाद झाला होता. त्यामुळे शाळेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येऊन चौकशी करावी, दोषींना अटक करून कारवाई करावी, त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याचा पवित्रा मृत कल्पेशच्या कुटुंबियांनी घेतला होता. मयत कल्पेशच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.