साईमत, जळगाव : प्रतिनिधी
लहान मुले हे देशाचे भविष्य आहे. मुलांनी जिज्ञासा पूर्वक प्रश्न विचारून सुसंवाद घडवावा, त्यातूनच समाज घडेल, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर यांनी केले. त्या गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित अहिंसा सद्भावना शांती यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
महात्मा गांधींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्त लालबहादूर शास्त्रीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर यांच्याहस्ते अहिंसा सद्भावना यात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यात्रेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. माहेश्वरी, गांधीजींचे पणतु तुषार गांधी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, अशोक जैन, अनिल जैन, आ.सुरेश भोळे, आ.लता सोनवणे, भरत अमळकर, माजी महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, राधेश्याम चौधरी, ॲड. रवींद्रभैय्या पाटील, अथांग जैन, सुरेश जैन, अब्दुल भाई, ज्योती जैन, निशा जैन, अंबिका जैन आदींसह शहरातील प्रशासकीय अधिकारी, जैन इरिगेशनमधील सहकारी, नागरिक व शहरातील हरिजन सेवक संघ कन्या छात्रालय, शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय, नंदनीबाई माध्यमिक विद्यालय, ओरियन इंग्लिश मिडीअम स्कुल, अनुभूती इंग्लिश मीडिअम स्कुल प्रायमरी, अनुभूती इंग्लिश मीडिअम स्कुल सेकंडरी, अनुभूती निवासी स्कुल, आदर्श सिंधी हायस्कुल, मनपा उर्दू माध्यमिक विद्यालय अशा शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
यात्रेत भारत माता, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कस्तुरबा गांधी, सरोजनी नायडू, अब्दुल कलाम यांची वेशभूषा असलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. ‘जय जवान जय किसान’, ‘महात्मा गांधीजी की जय’ चा नारा देत लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून शांती यात्रा निघून सरदार वल्लभभाई पटेल मनपा इमारत, पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रेचे समारंभात रूपांतर झाले.
श्रीमती अनुराधा शंकर यांनी आपल्या भाषणात मुलांशी संवाद साधताना गांधीजींविषयी रंजक गोष्टी सांगितल्या. लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुर्ष्पापण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वधर्म प्रार्थना होऊन ॲड. अच्युतराव अत्रे इंग्लिश मीडिअम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो…’ भजन गायन केले. प्रास्तविकेत गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे गतवर्षातील उपक्रमांविषयी अंबिका जैन यांनी माहिती दिली. नॅशनल लिडरशिप कॅम्पमधील प्रतिनिधीं समवेत गांधीजींचे पणतु तुषार गांधी यांनी अहिंसेची शपथ दिली. पी. जी. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात पदव्या प्रदान केल्या गेल्या.
‘खानदेश में महात्मा गांधी’ पुस्तकाचे प्रकाशन
यावेळी डॉ. विश्वास पाटील लिखित ‘खानदेश में महात्मा गांधी’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यात महात्मा गांधीजींविषयी कान्हदेशातील अनेक घटनांची नोंद ऐतिहासिक पुस्तकात आहे. त्याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी तुषार गांधी होते. यावेळी आ. सुरेश भोळे, आ. लता सोनवणे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, अनिल जैन, डॉ. सुदर्शन आयंगार, ज्योती जैन, भरत अमळकर, डॉ. विश्वास पाटील, फाउंडेशनच्या रिसर्च डिन गीता धरमपाल, अंबिका जैन आदी मान्यवर उपस्थित होते. दीपक चांदोरकर यांनी शेवटी राष्ट्रगीत म्हटले. सुत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले.
ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव
कार्यक्रमात गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकालही घोषित करण्यात आला. त्यात २१ जिल्ह्यातील १४५ स्पर्धक सहभागी झाले होते. पहिल्या गटातील पुरस्कार विजेत्यांमध्ये मानसी गाडे-प्रथम, (शेवगाव, जि. नगर), गुंजन अहिरराव-द्वितीय, (धाडणे, जि. धुळे) हंसिका महाले- तृतीय (भुसावळ) तर उत्तेजनार्थ नेहा पाटील, (नंदुरबार), धनश्री पाटील, (तारखेडा, ता. पाचोरा, जि. जळगाव), दुसऱ्या गटातील विजेत्यांमध्ये सृष्टी थोरात-प्रथम (नंदुरबार), सृष्टी कुलकर्णी – द्वितीय (जळगाव), पियुष अहिरराव- तृतीय, (धाडणे, ता. साक्री, जि. धुळे) उत्तेजनार्थ पारितोषिक प्रणाली पाटील, (तारखेडा, ता.पाचोरा), पीयुष अहिरराव हे विजेते ठरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकसह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
चरखा जयंतीनिमित्त गांधीतीर्थला अखंड ‘सूत कताई’
महात्मा गांधींनी चरखा हे राजकीय मुक्तीसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरून, ‘प्राचीन कार्य नीतिमत्तेचे’ रूपक म्हणून आणि ब्रिटिश राजवटीला आर्थिक आणि सामाजिक प्रतिक्रियेचे प्रतीक म्हणून वापरले. महात्मा गांधींनी त्यांचा जन्मदिन चरखा जयंती म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन केले होते. त्याचे औचित्य साधून बैलगाडीवर चरखाची मिरवणूकही काढण्यात आली. तसेच कार्यक्रमस्थळी फाउंडेशनचे काही सहकारी पूर्णवेळ सुतकताई करत होते. चरखा जयंतीनिमित्त गांधी तीर्थ येथे दिवसभर अखंड सूत कताई करण्यात आली.
