साईमत मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना चकमक घडवून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.
संजय गायकवाड यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर घडवण्यात कुणाचा सहभाग होता? याबद्दलही सूचक वक्तव्य गायकवाड यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) हत्येच्या कटाबाबत गौप्यस्फोट करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना दुसरं काहीही दिलं जाणार नव्हतं, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. मी जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे.”
एकनाथ शिंदेंच्या कथित एन्काऊंटरमागे नेमकी पार्श्वभूमी काय आहे? असा प्रश्न विचारला असता संजय गायकवाड पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती.
या धमकीनंतर राज्य सरकारने एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही सुरक्षा देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी बैठक सुरू होती. त्यावेळी ‘मातोश्री’वरून फोन आला आणि एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असं सांगण्यात आलं. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. त्यांना नक्षलींच्या हातून मारायचं होतं. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली.”