पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा
साईमत पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध समाजाभिमुख मागण्यांसाठी समता सैनिक दलाने आज प्रांताधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मोर्चाने प्रांताधिकारी कार्यालय गाठत उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनात नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, शहर अध्यक्ष गंगाराम तेली यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. मोर्चादरम्यान विविध सामाजिक प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये मागासवर्गीय महिलेच्या प्रेतयात्रेला विरोध करणाऱ्या समाजकंटकांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी आहे. तसेच संबंधित स्मशानभूमीच्या लगतची गावठाण जागा तात्काळ दफनभूमीत वर्ग करण्यात यावी, अतिक्रमण हटवून तेथे सुरक्षितता भिंत उभारण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय स्थानिक समाजबांधवांना पोलीस संरक्षण देण्याची, वाणेगाव येथील सामाजिक तणावासाठी जबाबदार ग्रामपंचायत बरखास्त करण्याची आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील नांद्रे, लोहार, खडकदेवळा खुर्द आदी ठिकाणच्या समाज मंदिरांवरील अतिक्रमण हटवून त्यांची स्वच्छता व दुरुस्ती करून ती समाजाच्या ताब्यात देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली.
एकूण आठ प्रमुख संविधानिक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून प्रशासनाकडून सातत्याने टाळाटाळ होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळेच प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून, समाजाभिमुख प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठवत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर दबाव वाढवला आहे.
