साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग लोकांच्या सुविधेसाठी आहे का जीव घेण्यासाठी ? तुम्हाला सुविधा देता येत नसतील, ठेकेदारांवर नियंत्रण नसेल तर काय उपयोग काय ? असा संतप्त सवाल करत ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी न्हई म्हणजे राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी संचालक शिवाजी पवार यांना फोन करून येत्या तीन दिवसात राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे दुरुस्त करा अन्यथा माझ्याशी गाठ असल्याचा अल्टीमेटम देऊन त्यांना चांगलेच धारेवर धरले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 29 रोजी खोटेनगर जवळ खड्ड्यात गाडीचे चाक अडकल्याने कंडलून दुचाकीवरील दोन महिलांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतांना आज 31 रोजी पुन्हा वाटीका आश्रमाजवळ भरधाव कारने एका ७८ वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली. यात वृद्धाच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.यामुळे संपूर्ण जिल्ह्यात व विशेषत: जळगाव शहरवासिय अत्यंत संतप्त दिसत आहेत. आज विविध राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी तब्बल दोन तास रास्तारोको करून आपल्या तीव्र भावना व्यक्त करून न्हईचे अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि ठेकेदाराने केलेले निष्कृष्ठ काम याबाबत प्रचंड रोष व्यक्त करून प्रशासनाला धारेवर धरले.
दरम्यान, याची गंभीर दखल घेत मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचा आज पाराच चढल्याचे दिसून आले. गिरीशभाऊ यांनी न्हईचे कार्यकारी संचालक शिवाजी पवार यांना कुठे आहेत म्हणून विचारणा केली असता सुटी असल्याने नागपूर असलेल्या या अधिकाऱ्यांना मंत्री महाजन यांनी चांगलेच फैलावर घेतले.
संपर्क अधिकारी देशमुख यांच्या मोबाईलवरून कॉल
जिल्ह्यात विविध कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर असलेले मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी दोन्ही अपघातांची माहिती जाणून घेतल्यावर आपल्या जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांना शिवाजी पवार यांना कॉल करत प्रचंड रागात आपल्या भावना व्यक्त करून येत्या तीन दिवसात शहरातून जाणाऱ्या नादुरुस्त सर्व महामार्गची दर्जेदार दुरुस्ती करा अन्यथा मी सरकारमधील मंत्री आहे हे विसरून लोकांसोबत तुमच्याविरुद्ध रस्त्यावर उतरल्यास तुम्हाला महाग पडेलया शब्दात कानउघाडणी केली.मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी शिवाजी पवार यांना कॉल केल्यावर त्यांच्या बोलण्याचा पारा चढला व आवाज वाढल्याने संपूर्ण अजिंठा विश्रामगृहात पिन ड्रॉप सायलेंट अनुभवयाला मिळाला. आता जिल्ह्यातील हेवीवेट मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी अल्टीमेटम दिल्यावर न्हईचे अधिकारी व ठेकेदार जागेवर येऊन महामार्ग दुरुस्ती व वाहतूक सुरळीत होते काय? याकडे संतप्त शहरवासियांचे लक्ष लागून आहे.