Ringangaon Murder Case : रिंगणगाव खून प्रकरण : नरबळीचे कलम लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिंगणगावकरांचा मोर्चा धडकला

0
5

फास्ट ट्रॅक न्यायालयात प्रकरण चालवून तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस महाजन या मुलाचा तेरा दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून केला होता. हा खून नसून नरबळीचा संशय व्यक्त करत शुक्रवारी, २७ जून रोजी रिंगणगावसह परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रोष व्यक्त केला. ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, नरबळीचे कलम लावावे, तपास सीआयडीकडे सोपवावा अशा मागण्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे मांडल्या आहेत.

मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी खा. स्मिता वाघ उपस्थित होत्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर केवळ मर्यादित लोकांनाच कार्यालयात प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी बाहेरच जोरात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी स्वतः बाहेर येत त्यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी निवेदन घेऊन ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव-खर्चे रस्त्यालगतच्या एका पडक्या शेतातील काटेरी झुडपात तेजस महाजन (वय १३) ह्याचा मृतदेह आढळून आला होता. संशयित आरोपीने त्याच्यावर कोठेही वार न करता केवळ गळ्यातील कंठ काढून घेतला. त्यामुळे हा नरबळी असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्याच्या वडिलांना १२ वर्षानंतर पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. तेजसच्या खून प्रकरणी नरबळीचा संदर्भ असल्याचा संशय स्थानिकांद्वारे व्यक्त केला आहे.

रिंगणगावातील ग्रामस्थ आणि मयत मुलाच्या नातेवाईकांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. यावेळी नातेवाईकांनी आरोपींना फाशी द्या…तेजसला न्याय द्या, असा एकच आक्रोश करत मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. तेजसच्या हत्येमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयित आरोपींना अटक केली असली तरी ग्रामस्थ आणि कुटुंबियांमध्ये तीव्र संताप अद्यापही कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी रिंगणगावातील नागरिकांसह नातेवाईक मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर जमले. त्यांनी हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करुन तेजसला न्याय मिळावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

नरबळी विरोधात ग्रामस्थांनी पुकारले होते आंदोलन

याप्रकरणी काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलीस नरबळीच्या शक्यतेला महत्त्व देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नरबळी विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here