प्राध्यापकांसह विद्यार्थिनींनी सादर केली ‘पावसाची गीते’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील डॉ.अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) येथे कला मंडळ, संगीत विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुंदर साजिरा श्रावण आला’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्ही. जे. पाटील होते. कार्यक्रमाचे उदघाट्न प्रमुख पाहुणे जळगाव येथील ‘हास्य जत्रा’ फेम प्रा. हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार ‘वर्धापन दिन’ साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बहिणाबाई चौधरी यांच्या कार्याचा गौरव करून संगीत विभागाच्या प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी विद्यापीठ गीत सादर केले. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ विनोदी मालिकेतील सुप्रसिद्ध कलावंत प्रा. हेमंत पाटील यांनी उद्घाटनपर मनोगतातून विद्यार्थिनींना कलेची जोपासना करण्याचा संदेश दिला. तसेच स्वत:ला आवडेल ती कला जोपासा, असे सांगत कला क्षेत्रातले अनुभव मनोगतातून सांगितले. तसेच अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. व्ही. जे.पाटील यांनी कलेचे जीवनातील महत्त्व विशद केले. त्यानंतर पावसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील प्राध्यापकांसह विद्यार्थिनींनी मराठी, हिंदी सदाबहार ‘पाऊस गीते’ सादर केली. त्यात ‘अधीर मन झाले…’ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ‘रिमझिम गिरे सावन’, ‘सावन मे मोरनी बनके’, ‘एक लडकी भीगी भागीसी’, ‘छम छम छम’, ‘सावन का महिना’ असे विविध सुरेल गीते सादर झाली.कार्यक्रमाची सांगता मराठी, हिंदी, इंग्रजी रिमिक्स पाऊस गीतांनी चैतन्यमय वातावरणात झाली. गीतांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात सांस्कृतिक प्रतिनिधींची निवड
यावेळी उपप्राचार्य डॉ.पी.एन तायडे, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, उपप्राचार्य सुनीता पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सांस्कृतिक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. कार्यक्रमास कनिष्ठ, वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रास्ताविक कला मंडळ प्रमुख डॉ.अनिता कोल्हे तर सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार, प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी केले.