साईमत जळगाव प्रतिनिधी
सत्संग जीवनाचा आधार आहे. नामस्मरण झाल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. जितकी तुम्ही पूजा-अर्चा कराल तितके तुमचे जीवन उजळ होईल. शिवशंभू प्रभू हा एक ब्रँडेड साबण आहे, जो आतून आणि बाहेरून सर्व घाण आणि डाग धुतो. नामस्मरणासाठी म्हातारपणाची वाट पाहू नका. तारुण्यात देवाचे स्मरण करत राहा, आयुष्य पुढे जाईल. कोणाकडे कितीही संपत्ती असली तरी शिवकथा ऐकूनच आत्मिक शांती मिळते. ईश्वरप्राप्तीसाठी जीवनात सर्व सोयी असणे आवश्यक नाही, तर सत्कर्म आणि ईश्वरसेवा हेच आवश्यक आहे. असे महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी (बापू) यांनी शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिवभक्तांना सांगितले.
महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजींचे स्वागत दीपक साखरे यांनी केले तर शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री महाजन यांनी शिवमहापुराण ग्रंथाचे पूजन केले. चौथ्या दिवसाच्या कथाप्रारंभावेळी कथामंचावर लुले काका, विष्णू भंगाळे, दीपक सुर्यवंशी, गायत्री राणे, सुरेखा तायडे, मुकुंदा सोनवणे, किशोर सुर्यवंशी, आनंदराव मराठे, जितेंद्र मराठे, धीरज सोनवणे, सुनील भावसार, सदाशिव ढेकळे, राजेंद्र मराठे, प्रविण कोल्हे आदींनी विधिवत आरती केली.
दरम्यान, कथेला विशेष उपस्थिती देणारे राजस्थानचे उद्योगपती नानजीभाई गुजर, गुजरात राज्यातील विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रभाई पायक व निर्मला शेखावत यांचे स्वागत शिवमहापुराण समितीच्यावतीने मुख्य संयोजक आमदार राजूमामा भोळे, सीमाताई भोळे यांनी केले.
सत्संगाच्या चौथ्या दिवशी पूज्य बापूजींनी ‘श्री शिवाय नमोस्तुभ्यं’, ‘शिवशंभू’ या संगीतमय सादरीकरणासह ‘डमरू वाले आजा तेरी याद सताये’ या भजनातून जीवन जगण्याच्या कलेवर व्यासगादीवरुन उपस्थित भक्तांशी संवाद साधला. शिवपुराणात महादेव हा करुणेचा सागर असल्याचे सांगितले आहे. ते एक दिव्यपुरुष आहेत. माता पार्वती म्हणते की, मी तुमची पत्नी आहे हे माझे मोठे सौभाग्य आहे. इतकी वर्षे तुम्ही माझ्यासोबत विहार करीत आहात. आता मला हे जाणून घ्यायचे आहे की, मोक्ष आणि मानसिक समाधान मिळविण्यासाठी काय करावे लागेल. तेव्हा शिवशंकर म्हणाले, जीवनात कल्याण आणणारी दृष्टी आणि भक्तांच्या उद्धाराकडे नेणारा योग्य मार्ग म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्षाच्या महिमेविषयी बापूंनी सांगितले की, हजारो वर्षे तपश्चर्येमध्ये लीन असलेले भगवान शंकर अचानक त्यांचे दोन्ही डोळे उघडतात, ज्यातून अश्रूंचे थेंब टपकतात आणि अशा प्रकारे रुद्राक्षाचे झाड जन्माला आले.
जे हिमालयाच्या आसपास वाढले. या सर्वोत्तम फळाचा मंत्रांनी अभिषेक करून धारण केल्याने, कपाळावर त्रिपुंड लावून त्याची पूजा केल्यास अपेक्षित फळ मिळते. रुद्राक्षाच्या अपार महिमेने यमदेवही घाबरले. कारण ते विधिवत परिधान केल्याने माणसाला दीर्घायुष्य मिळते. तेव्हा पार्वतीने भगवंतांना विचारले, हे इतके प्रतापी आहे का? तेव्हा प्रभु म्हणाले, कितीही मोठा पापी असला तरी रुद्राक्षामुळे त्याला सद्बुद्धी प्राप्त होते आणि तो शिवभक्तीत लीन होतो. गंगाजलाने शुद्ध केलेले रुद्राक्ष धारण केल्याने असुरांचा त्रास दूर होतो आणि जीवनात सकारात्मकता येते. विश्वाचे निर्माते भगवान शंकर यांच्या अश्रूंपासून बनलेल्या या रुद्राक्षात अफाट शक्तींचा समावेश आहे. संतांनी दिलेला रुद्राक्ष शिवाशिव बनतो म्हणजेच त्याला शिव आणि पार्वती दोघांचा आशीर्वाद मिळतो. रुद्राक्ष ब्लडप्रेशर धारण केल्याने हृदयाच्या धमन्या व्यवस्थित काम करू लागतात आणि मानसिक संतुलन बरोबर राहते, असेही विज्ञान सांगते. महामंडलेश्वर बापूजी यांनी उद्या (दि. 4) वाटण्यात येणारे रुद्राक्षाचा महिमा सांगून ते स्वतः हिमालयातून आणले असून ते जळगावातील जनतेला प्रसाद म्हणून वाटणार असल्याचे सांगितले.
चौथ्या दिवशीच्या कथासमारोपाच्या वेळी कथामंचावर डॉ.ए.जी.भंगाळे, डॉ.राहुल महाजन, चंदूभाई पटेल, उदय पाटील, विजय काबरा, अशोक धूत, भरत अमळकर, सागर भंगाळे, महेश चौधरी, नितीन सुधाकर पाटील, यशवंत बारी, पीडब्ल्युडी अधिक्षक अभियंता पी.पी.सोनवणे, प्रदीप रोटे, सुशील हासवानी, नानजीभाई गुजर, गौरव राजेश पाटील, रणजीत बोथरा, हेमंत देशमुख, विकास खडके, शक्ती महाजन व ललित बडगुजर आदींनी सपत्निक आरती केली. तर प्रातिनिधिक स्वरुपात निवड झालेल्या उपस्थित भक्तगणांपैकी अलखनंदा दशरथ पाटील, चित्रा राणे, अरुणा शिंपी व वसंत बाबूराव शिरसाळे यांनाही आरतीचा मान देण्यात आला.
यावेळी माजी विधानपरिषद सदस्य चंदूभाई पटेल यांनी महामंडलेश्वरांचा आशीर्वाद घेतला. शेवटी भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले. पंच दिवसीय शिवमहापुराण महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवार, दि. 4 सप्टेंबर रोजी पूज्य बापूजी रुद्राक्ष महिमेसह उपस्थित भक्तगणांना रुद्राक्ष देणार आहेत. कथा श्रवण करण्यासाठी भाविकांनी दुपारी 1.15 वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.