वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् पावसाचा इशारा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
मुंबईतील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. बुधवारी, २८ मे रोजी दुपारी पावणे पाच वाजता झालेल्या प्राप्त इशाऱ्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व यंत्रणांना तयारीत राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी :
विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास शक्यतो घरातच रहावे. सुरक्षित निवारा नसल्यास सखल जागा निवडून गुडघ्यात डोके घालून बसावे. विजा चमकत असताना उघड्यावर, छतावर, गॅलरीत अथवा झाडाजवळ थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करावीत. विजेचे खांब, तारांचे कुंपण आणि लोखंडी वस्तूंना स्पर्श करू नये. पाण्यात उभे असल्यास त्वरित कोरड्या जागी जावे.
टाळावयाच्या कृती :
विजा चमकत असताना लँडलाईन फोन, शॉवर, नळ, पाईपलाइन किंवा अन्य विद्युत उपकरणांचा वापर करू नये. धातूच्या तंबूत अथवा शेडखाली आसरा घेऊ नये. उंच झाडांखाली थांबू नये. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ थांबणे टाळावे. उघड्या दरवाजातून किंवा खिडकीतून विजेचा प्रकाश पाहण्याचा मोह टाळावा. जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकृत शासकीय सूत्रांकडूनच माहिती मिळवावी. आपत्कालीन स्थितीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.