साईमत, मुंबई : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास ११ हजार पदांसाठीची जाहिरात उद्या म्हणजे मंगळवारी,२९ ऑगस्टरोजी येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. ठाण्यात एकाच दिवशी १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला व्ोग आल्याचं दिसून येत आहे.
राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातले आणि या प्रक्रियेला सुरूवात केली. गेल्या आठवड्यामध्ये ही भरती सुरू होणार असे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित जाहिरात मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील १०,९४९ जागांसाठी ही जाहिरात निघणार आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ’क’ वर्गातील ५५ प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील ५ प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
