जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत कार्य अन् पंचनामे सुरू
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यात बुधवारी, ११ जून रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. अशा नैसर्गिक आपत्तेमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक भागात घरे, शेती, वीजपुरवठा आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत कार्य आणि पंचनामे सुरू केले असल्याचे सांगण्यात आले. आपत्तीत एरंडोल तालुक्यातील फरकांडे गावातील नारायण सिताराम पाटील (वय ६८) यांच्या घराचे पत्रे लागून मृत्यू तर एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील जगन राहेमाटे (वय ७५) यांच्यावर घराची भिंत कोसळून, जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथील रोहिणीबाई बारेला यांच्यावर पत्र्याचे शेड कोसळून मृत्यू झाला. तसेच पाचोरा, यावल व जामनेर तालुक्यांमध्ये पाच जण जखमी झाले आहेत.
वादळामुळे पशुधनाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्यात १७ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. त्यात एरंडोल १२, जामनेर २, भडगाव २ आणि पाचोऱ्यात १ जनावराचा समावेश आहे. घरांचे नुकसान झालेल्यांमध्ये चाळीसगाव ७, भडगाव ५, मलकापूर ५, रावेर ४ अशी २१ घरे बाधित झाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने सर्व तालुक्यांत पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रस्त्यांवरील पडलेली झाडे व विद्युत खांबे हटवून खंडित वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्तीग्रस्त भागांना भेटी देऊन केली पाहणी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपत्तीग्रस्त भागांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी संबंधित विभागांना पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश दिले. रात्री उशिरापर्यंत त्यांनी शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातून तालुका स्तरीय यंत्रणेला आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्य राबविण्याचे आदेश दिले. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष गजेंद्र पाटोळे यांनी रस्त्यावर उतरून मदत कार्यात सहभाग घेतला. त्यांनी रस्त्यावर पडलेली झाडे हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू केले. हवामानाची स्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून मदत व पुनर्वसनाचे कार्य सुरू असून, सर्व संबंधित यंत्रणा सज्ज आहेत.
वादळामुळे वीज महावितरणाला फटका, वेगात काम सुरु
जळगाव जिल्ह्यात बुधवारी, ११ जून रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे.महावितरणच्या अधोसंरचनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.वादळामुळे १५ उपकेंद्रांची वीज सेवा तात्पुरती खंडित केली होती. महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ठेवत त्यापैकी ५ उपकेंद्रांची सेवा पूर्ववत केली आहे. उर्वरित १० उपकेंद्रांची वीज सेवा दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ववत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महावितरणच्या विविध विभागांतील पथके सलग दिवसरात्र काम करत आहेत. वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि अन्य आवश्यक साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले आहे. इतर भागांतून अतिरिक्त कर्मचारी व तांत्रिक पथकेही जिल्ह्यात दाखल झाली आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे. कोणताही धोका पत्करण्यात येणार नाही. नागरिकांनी सहकार्य करून कोणत्याही तुटलेल्या वा धोकादायक वीज संरचनेपासून दूर राहावे, असे आवाहन वीज महावितरणने केले आहे.
आरोग्यदूताला ‘देव तारी त्याला कोण मारी’चा आला प्रत्यय
जळगाव शहरात ११ जून रोत्री रात्री ८.३० वाजता अचानक जोरदार वादळ व पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळामुळे बहुतांश भागात झाडे उन्मळून पडली. वीज खंडित झाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच वादळी हवामानात आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ‘आरोग्यदूत ॲम्ब्युलन्स’ सेवा सतत जनतेच्या सेवेत कार्यरत होती. त्या सेवेचे निष्ठावान चालक जालमसिंग राजपूत हे ॲम्ब्युलन्स घेऊन जात असताना त्यांच्या वाहनासमोर अचानक एक प्रचंड झाड कोसळले. केवळ काही फुटांचे अंतर आणि काही सेकंदाचा वेळ… पण ईश्वराच्या कृपेने आणि गिरीश महाजन यांच्या सेवाव्रताच्या छायेत गाडी थोडक्यात बचावली. गाडीचे किरकोळ नुकसान झाले. मात्र, मोठा अपघात टळला. ज्यांनी अनेक रुग्णांना वेळेत पोहोचवून त्यांचे प्राण वाचवले. अशा सेवाव्रती कार्यकर्त्याच्या रक्षणासाठी खुद्द निसर्गानेही दया दाखवली असल्याचा सूर जनसामान्यातून उमटला. ही घटना हेच सांगते की, ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशा प्रत्ययाची प्रतिक्रियाही जनतेतून उमटली.