साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चाला अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक तहसील कार्यालय बुलडाणा येथून सुरुवात झाली होती. शिवालय, संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र द्यावे, मेंढपाळ- बांधवांना वनचराईसाठी कायमस्वरूपी पास देण्यात यावे, जालना येथील समाज बांधवावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन केले होते. आंदोलनाला आ. संजय गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. ढोल ताशांच्या निनादात मोर्चा निघाला होता. यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात लावण्यात आला होता. घोषणा वगळता हा मोर्चा शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. पिवळे झेंडे व डोक्याला हळद लाऊन महिलांसह पुरुष मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चाला नंदुभाऊ लवंगे यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात सचिन सपकाळ, राम गडकर, राम जुमडे, विष्णू साखरे, अनिल ढवळे, दिलीप दिवटे, धनंजय रोंदळे, धनश्री काटीकर पाटील, मंगला लवंगे, सुमन सपकाळ, सिंधू सुसर, सुलोचना जुमडे, उषा चाटे, मंगला ढवळे, अरुणा सुशिर, सुनीता साखरे, संगीता ढवळे, राधा गावडे, लक्ष्मी ढवळे, सिंधू सुशिर यांच्यासह अग्रभागी महिला सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.