कडाक्याच्या उन्हात २५० जार पाण्याचा दिलासा
साईमत पाळधी प्रतिनिधी
पाळधी रेल्वे स्थानक येथे तांत्रिक कारणांमुळे तब्बल तीन तास खोळंबलेल्या उधना-हसनपूर एक्सप्रेस मधील प्रवाशांसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तत्काळ पुढाकार घेत ‘माणुसकीचा आदर्श’ घालून दिला. कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या प्रवाशांना त्यांनी तातडीने २५० पाण्याचे जार उपलब्ध करून देत मोठा दिलासा दिला.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी स्थानकावर सकाळी ११ वाजता उधना ते हसनपूर दरम्यान धावणारी ही रेल्वे गाडी रेल्वे लाईन क्लिअर नसल्यामुळे थांबवण्यात आली होती. सुरुवातीला काही मिनिटांचा वाटणारा हा थांबा तब्बल तीन तास लांबला आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
उन्हाचा पारा चढलेला असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल सहन करावे लागले. स्थानकावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. याच दरम्यान परिस्थितीची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने २५० पाण्याचे जार मागवून प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था केली. या मदतीमुळे अडकलेल्या प्रवाशांची तहान भागली आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या वेळी प्रवाशांनी प्रतापराव पाटील यांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे मनापासून कौतुक करत आभार मानले.
“रेल्वेच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांना होणारा त्रास पाहून ही मदत करणे आपले कर्तव्य होते. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांचे हाल पाहवत नव्हते, म्हणूनच तत्काळ पाण्याची व्यवस्था केली,” असे प्रतिपादन प्रतापराव पाटील यांनी केले.
या संपूर्ण घटनेमुळे स्थानिक पातळीवर त्यांच्या तत्परतेची आणि सामाजिक भानाची जोरदार चर्चा सुरू असून, अडचणीच्या क्षणी धावून येणारा लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण या प्रसंगातून समोर आले आहे.
