लग्नमंडपात रक्तरंजित संघर्ष व्हॉट्सअॅप वादातून तिघांचा मृत्यू, धुळे जिल्हा हादरला
साईमत/धुळे/प्रतिनिधी
आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरणाने भरलेला लग्नसोहळा क्षणात शोकसभेत परिवर्तित झाल्याची हृदयद्रावक घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील नीलकंठ नगर परिसरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान झालेल्या भीषण हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नीलकंठ नगर येथे विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असताना साखरपुड्याची तयारीही सुरू होती. साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये अचानक वादाची ठिणगी पडली. सुरुवातीला शाब्दिक चकमकी झाल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि काहींनी धारदार शस्त्रे काढत एकमेकांवर हल्ला चढवला. काही क्षणांतच लग्नमंडप रक्ताने माखला गेला.
या वादामागे व्हॉट्सअॅपवर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ हे कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. संबंधित संदेशांमुळे दोन्ही बाजूंमध्ये आधीपासून तणाव होता. त्याच पार्श्वभूमीवर साखरपुड्यापूर्वी कुरापत काढत हा हिंसक संघर्ष उफाळून आल्याचे सांगितले जाते.
या घटनेत देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (३५), सुरेशगीर मोजगीर गोसावी (५५) आणि साहिल सुरेश गोसावी (२२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्षु शंभू गोसावी यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
ज्या घरात सनई-चौघड्यांचे मंगल सूर घुमणार होते, त्या घरात आता रडारड आणि शोककळा पसरली आहे. लग्नाच्या आनंदावर काळी सावली पडली असून संपूर्ण गाव हादरले आहे. सोशल मीडियावरील किरकोळ वाटणाऱ्या वादातून एवढा भीषण परिणाम घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
