दगडी दरवाज्याच्या आतमध्ये भव्य मंचावरून होणार मिरवणुकांचे स्वागत
साईमत।अमळनेर।प्रतिनिधी।
परंपरेप्रमाणे शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करून शहराची शांतता प्रस्तापित ठेवणाऱ्या आदर्श मंडळांचा “श्री सन्मान” मंगळवारी, १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला अमळनेरच्या शांतिदूतांकडून होणार आहे. यासाठी गणेशोत्सवात अति संवेदनशील क्षेत्र ठरणाऱ्या दगडी दरवाज्याच्या आत भव्य मंच उभारला आहे. त्याठिकाणीच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शांतताप्रिय मिरवणुकांचे अनोखे स्वागत व सन्मान केला जाणार आहे.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, मुंदडा फाऊंडेशन, पोलीस स्टेशन, नगरपरिषद आणि महसूल विभाग आदींच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गेल्यावर्षी हा उपक्रम राबविला असता सर्व मंडळांनी भरभरून दाद देत मंचावरून होणाऱ्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले होते. परिणामी कोणताही गोंधळ न होता सर्व मिरवणूक शांततेत पार पडल्या होत्या.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ नेहमीच सामाजिक व शासकीय उपक्रमात सहभागी होऊन सकारात्मक उपक्रम राबवित असतो. गेल्या वर्षाचा चांगला अनुभव पाहता पत्रकार संघ आणि मुंदडा फाऊंडेशन यांनी यावर्षीही पुढाकार घेतल्याने पोलीस विभाग, नगरपरिषद आणि महसूल विभाग अशा सर्वांनी यात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे. सर्व मंडळांनी शांतीदूत होऊन श्री सन्मानाचे मानकरी ठरावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अनेकांनाही सन्मानित केले जाणार
यावेळी सातव्या व नवव्या दिवशी शांततेत विसर्जन करणारे आदर्श मंडळ आणि हिंदू-मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी वर्गालाही येथे सन्मानित केले जाणार असल्याने त्यांनीही उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.