संमेलनात कवी, कवयित्रींनी कविता सादर करून आणली रंगत
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पुणे येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात नुकत्याच दोन दिवसीय पार पडलेल्या आठव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनात जळगावातील कवींनी सहभाग नोंदविला होता. तसेच राज्यभरातूनही अनेक कवी, कवयित्री सहभागी झाले होते. संमेलनात जळगावमधून नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या जळगाव जिल्हाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री पुष्पलता एन.कोळी, ज्येष्ठ कवी निवृत्तीनाथ कोळी, शाहनूर तडवी, जिजाबराव सोनवणे, यावलच्या कवयित्री स्वाती सूर्यवंशी, योगीता कोळी, राजू कोळी, पितांबर कोळी आदी सहभागी झाले होते.
आठव्या नक्षत्र महाकाव्य संमेलनाचे म.भा.चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर ग्रामगीताचार्य राज्य समन्वयक बंडोपंत बोढेकर, डाॅ.शांताराम कारंडे, डाॅ.अलका नाईक, संयोजक कवी प्रा.राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.
अभिनव पद्धतीने महाकाव्य संमेलन
उद्घाटनापूर्वी एका वृक्षाच्या रोपट्याला पाणी अर्पण करून अभिनव पद्धतीने महाकाव्य संमेलनाला सुरवात झाली. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी संस्थेची आतापर्यंतची माहिती विशद केली. अनेक संकटांवर मात करत त्यांनी संस्थेची कारकिर्द ओघवत्या शैलीत सादर केली. संमेलनात जळगावच्या कवी-कवयित्रींनी कविता सादर करून रंगत आणली. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या साहित्यिकांनी आपआपल्या कविता सादर केल्या. संमेलनात पुस्तक प्रकाशन, सन्मान वितरण, फोटोसेशन, अध्यक्षीय भाषण हास्यकल्लोळात झाले. शेवटी पसायदानाने संमेलनाचा समारोप झाला.