श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यात सेवेकरींचा उत्स्फूर्त सहभाग
साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी
प.पु. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि युवा संत आदरणीय चंद्रकांत दाद यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री स्वामी समर्थ केंद्र जानकी नगर तर्फे आयोजित जळगाव ते त्र्यंबकेश्वर पायी पालखी सोहळा यंदा दहाव्या वर्षी उत्साहात प्रस्थान झाला. सोमवारी सकाळी ८ वाजता ‘श्री स्वामी समर्थ’ नामाच्या जयघोषात भक्तांचा उत्साह झळकला, तर सामाजिक बांधिलकीची जाणीवही जाणवली.
भक्तीसोबत पर्यावरणीय जबाबदारी
या दहाव्या वर्षाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ आध्यात्मिक आनंद नव्हे, तर सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारी देखील यामध्ये समाविष्ट आहे. प्रवासादरम्यान डॉ. लीना पाटील यांच्या नेतृत्वाखाली, भक्तांना मातीची भांडी (परळ) वाटप करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. याशिवाय, मार्गातील नद्यांची स्वच्छता, वृक्षारोपण, तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देणे, हे बहुआयामी उपक्रम या पालखी सोहळ्याचा भाग आहेत.
मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही स्वागत
पालखीचे प्रस्थान जळगाव जिल्हा प्रमुख विजय निकम काका आणि एन. डी. बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर जुने जळगाव, रथ चौक आणि शाहूनगर मार्गे प्रताप नगर केंद्रात दाखल झाली. येथे सकाळी १०:३० वाजता महापौर दीपमाला काळे आणि माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
सेवेकऱ्यांचे नियोजन आणि पाहुणचार
दुपारी मानराज पार्क येथे श्री. रवींद्र त्र्यंबक माळी यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच दुपारी ३ वाजता जैन इरिगेशन तर्फे वारकरी व सेवेकऱ्यांसाठी चहा-पाणीची व्यवस्था करण्यात आली. संध्याकाळी ६ वाजता पाळधी येथील केंद्रात आमदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आरती होणार आहे.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके व १८ विभागांतील शेकडो सेवेकरी अथक परिश्रम घेत आहेत. भक्ती आणि पर्यावरणाचा हा सुंदर संगम संपूर्ण मार्गावर भक्तांचे आणि नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
