राष्ट्रजागृती वारकरी परिषदेतर्फे स्पर्धेचे आयोजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
संत कबीर जयंती आणि आषाढी वारी पर्वानिमित्त राष्ट्रजागृती वारकरी परिषदेतर्फे जिल्हास्तरीय हरिपाठ , निरूपण स्पर्धेचे बुधवारी, ११ जून रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजन केले आहे. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा त्यानंतर सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण तसेच सामूहिक पसायदानाने स्पर्धेची सांगता करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय समाज प्रबोधनकार ॲड. माईसाहेब महाराज पाटील यांनी सांगितले.
वारकरी संत तत्वाचा प्रचार व प्रसार करणे तसेच हरीपाठाची संस्कृती शहरी भागात पसरविणे आणि भक्ती, प्रगल्भता, सत्य, संत चरित्र प्रसारित करणे असा स्पर्धेचा उद्देश असणार आहे. स्पर्धेचे नियम व अटी लागू केले आहे. सामूहिक हरिपाठ सादर करताना तीन टाळकरी, दोन गायक, एक मुर्दुंग वादक आवश्यक आहे. त्यात सांप्रदायिक व शास्त्रीय चालीचा उपयोग करावा. तसेच वेशभूषा, नियमबद्ध शिस्त असणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे मिळणार
एकल निरुपण सादर करताना हरिपाठातील एक अभंग निवडून त्यांचे सर्व चरण सोडविणे आहे. त्यासाठी ३० वर्ष वयाची अट ठेवली आहे. स्पर्धेत सामूहिक हरिपाठासाठी प्रथम पारितोषिक १० हजार रुपये, दुसरे ७ हजार तर तिसरे ५ हजार तसेच एकल निरुपण स्पर्धेत प्रथम पारितोषिक २ हजार तर दुसरे १ हजार रुपयाचे पारितोषिक ठेवल्याचे आयोजकांनी सांगितले.