मुंबई ः प्रतिनिधी
नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यापाठोपाठ आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील घडामोडींच्या निमित्तानेही राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयएए लीडरशिप अवॉर्ड्सच्या निमित्ताने बुधवारी संध्याकाळी मुंबईत जाहीर मुलाखत झाली.या मुलाखतीमध्ये इतर मुद्द्यांबरोबरच आपल्या राजकीय भूमिकांवरही देवेंद्र फडणवीसांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांना ‘ब्रँड पॉलिटिशियन’बाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. “जो बिकता है,उसीपर ज्यादा चर्चा होती है.राजकारण तसेच आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या चित्रपटांमध्ये सावकार खलनायक असायचे. शोलेच्या काळात डाकू खलनायक असायचे. त्यानंतर तस्कर खलनायक असायचे. आजकालच्या चित्रपटांमध्ये दोनच खलनायक दिसतात, एक तर राजकारणी किंवा मग पोलीस. त्यामुळे राजकारण हे ब्रँड बिल्डिंगच आहे”, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.