नवीदिल्ली : वृत्तसंस्था
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा सोमवारी (दि. ९ ऑक्टोबर) करण्यात आली. भाजपासाठी या पाचही राज्यांतील निवडणुका महत्त्वाच्या ठरतात. या पाच राज्यांच्या निकालावरून आगामी लोकसभा निवडणुकांची वातावरण निर्मिती भाजपाला करता येऊ शकते तसेच भाजपा संघटनेसाठीही हे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.२०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांंमध्ये पाचही राज्यांत भाजपाचा पराभव झाला होता.राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. तेलंगणात भारत राष्ट्र समितीचे सरकार पुन्हा आले होते आणि ईशान्य भारतातील मिझोराम राज्यात मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाचा विजय झाला होता. मध्य प्रदेशात कांँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे २०२० साली भाजपाने सत्तास्थापन केली होती तर मिझोराममध्ये एमएनएफ पक्षाने एनडीएला पाठिंबा दिलेला आहे.
भाजपाकडून आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर त्यामध्ये केंद्रातील अनेक बडे नेते निवडणुकीत उतरविल्याचे दिसून येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यांमध्ये नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचवेळी निवडणुका होत असलेल्या सर्व राज्यांत असे दिसून येत आहे की, भाजपाने स्थानिक नेतृत्वाऐवजी पक्षाच्या नावावर मतदान मागण्यास प्राधान्य दिले आहे.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने याबाबत म्हटले की, पाच राज्यांतील निवडणुका भाजपाच्या संघटनेसाठी महत्त्वाच्या आहेत पण,त्या आगामी लोकसभा निवडणुकांची ही रंगीत तालीम किंवा उपांंत्य फेरी नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची ही चाचणी नाही.२०१८ च्या निवडणुकीत पाचही राज्यांत पराभवाचा सामना करूनही २०१९ साली लोकसभेच्या निवडणुकीत भारी बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन केली असल्याचीही आठवण या नेत्याने करून दिली.
मात्र, यावेळच्या निवडणुकांची लक्षणीय बाब अशी की, यंदा भाजपाच्या विरोधात विरोधकांनी एकत्र येऊन आघाडी उघडली आहे.याचा अर्थ भारताच्या मध्यभागी असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान निवडणुकीत जर काँग्रेसने विजय मिळविला तर त्याचा प्रभाव मागच्यावेळेपेक्षा जास्त असेल. ही तीन राज्य भाजपा विरुद्ध इंंडिया आघाडीचे भवितव्य ठरवतील, तर कर्नाटक राज्यात झालेल्या पराभवानंतर तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपा कशी कामगिरी करतो? यावरून पक्षाची दक्षिणेतील पुढील वाटचाल ठरणार आहे.
मिझोराम राज्यात भाजपाला फारसा वाव नसला तरी मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मिझोरामचे निकाल ईशान्य भारतासाठी निदर्शक ठरू शकतात. ईशान्य भारत भाजपासाठी महत्त्वाचा प्रदेश आहे.मिझोराममधील मिझो समुदाय हा मणिपूरमधील कुकी-झोमी समुदायाशी वांशिक नाते असलेला समुदाय आहे.मागच्या पाच महिन्यांपासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी-झोमी आदिवासी जमातींमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे.
