साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द व बुद्रुक या गावांना येत्या आठ दिवसानंतर फिल्टर, शुद्ध पाणी मिळण्यास सुरूवात होईल. शुद्ध जल संचय विहीर व पंप हाऊसचा हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाची पाणी साठवणूक क्षमता ६ लाख २५ हजार लिटर्स एवढी आहे. मंगळवारी, २३ जानेवारीपासून प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळला आहे. जानेवारी महिन्यापासून शुद्ध पाणी मिळण्याचा शब्द त्यांनी दिला होता.
प्रकल्पाची पाहणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केली. त्यांनी सर्व तांत्रिक बाबींची पाहणी केली. पाहणीत प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करीत असल्याचे निश्चित झाले. याप्रसंगी शेतकी संघाचे संचालक संजय पाटील, लिपीक शिवाजी पाटील, शुभम पाटील, राजेंद्र चौधरी, गणेश माळी, संजय कुमावत, अजय पाटील आदी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे यापुढे पाळधी गावात शुद्ध पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.