उद्योग आणण्याची जबाबदारीही स्थानिक उद्योजकांच्या गळ्यात बांधल्याने व्यक्त होतेय आश्चर्य
साईमत/नाशिक/प्रतिनिधी :
नाशिकच्या उद्योजकांना अनेक वर्षांपासून आयटी पार्कचे केवळ गाजर दाखवले जात आहे. मात्र, ठोस काहीच घडत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या आयटी धोरणात नाशिकला डावलण्यात आले असताना, उद्योगमंत्र्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आयटी पार्कसाठी २५ एकर जागेची घोषणा करत तेथे उद्योग आणण्याची जबाबदारीही स्थानिक उद्योजकांच्या गळ्यात बांधल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबई-पुण्यानंतर नाशिकमध्ये आयटी उद्योगांना मोठा वाव आहे. या क्षेत्रातील मोठे उद्योग आल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल, असे स्थानिक उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे निमा, आयमासारख्या संघटनांकडून नाशिकमध्ये आयटी पार्क उभारण्याची मागणी केली जात आहे. औद्योगिक महामंडळाने अंबड येथे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून उभारलेले आयटी पार्क १६ वर्षांपासून धूळ खात पडून होते. ही इमारत नंतर एका अन्य क्षेत्रातील कंपनीला लीजवर देण्यात आली. सुमारे साडे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नाशिकमध्ये नवे आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २०२२ च्या डिसेंबरमध्ये आयमा कार्यालयात झालेल्या बैठकीत १०० एकर जागेवर आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ते अनेकदा नाशिकमध्ये येऊन गेले. परंतु, याप्रकरणी ठोस कार्यवाही अद्यापही झालेली नाही.
मधल्या काळात १०० एकर ऐवजी ५० एकर जागा दोन टप्प्यात देण्याचा शब्द सामंत यांनी दिला. त्याआधी काही वर्षांपूर्वी भाजपच्या आग्रहामुळे मनपाकडून याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. आडगाव शिवारात मनपाची १० एकर जागा व परिसरातील शेतकऱ्यांकडून भूसंपादन करून ८० एकर जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी मनपाच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद केली होती. केंद्र सरकारकडूनही २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, त्याबाबतही पुढे काही होऊ शकले नाही. आयटी पार्कचे ठिकाण कधी आडगाव तर कधी राजूरबहुला असे दर ६ महिन्यांनी बदलत राहिले. आता सामंत यांनी राजूरबहुला येथे आयटी पार्कसाठी २५ एकर जागा २ वर्षांसाठी आरक्षित ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, तेथे आयटी उद्योग आणण्याची जबाबदारी स्थानिक उद्योजकांवर टाकली आहे.
दोन वर्षांत उद्योग न आल्यास जागा अन्य उद्योगांना दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. म्हणजे जागेची घोषणा करून मोकळे व्हायचे आणि उद्योग न आल्यास स्थानिक उद्योजकांना जबाबदार धरायचे, असा हा प्रकार असल्याच्याच भावना नाशिकमधून व्यक्त होत आहेत. राज्य सरकारच्यावतीने जून २०२३ मध्ये नवे आयटी धोरण जाहीर करण्यात आले. त्यानुसार धोरणात नाशिकचा उल्लेखही नसल्याने नाशिककरांची निराशा झाली.
नाशिकमध्ये दीडशे उद्योग
नाशिक शहरात सध्या सुमारे १५० आयटी उद्योग आहेत. मात्र, त्यात मोठ्या उद्योगांची संख्या फारच कमी आहेत. बहुतांश आयटी उद्योग ५० ते ६० मनुष्यबळाचे लघुउद्योग स्तरावरील आहेत. शहरात मोठे उद्योग आले तरच या क्षेत्राला चालना मिळू शकणार आहे.
अनेक वर्षांपासून आयटी पार्कबाबत घोळ सुरू आहे. निव्वळ जागांची घोषणा होत आहे. आयटी उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक ते आयटी धोरण नाशिकमध्ये लागू नाही. खरोखर आयटी पार्क अस्तित्वात आल्यास उत्तम होईल. पण दुर्दैवाने ते घोषणांच्या पातळीवरच राहत आहे.
– मकरंद सावरकर, अध्यक्ष, नाशिक आयटी असोसिएशन
उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम राबवले जातील. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयटी कॉन्क्लेव्ह घेणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्वांना बोलावणार आहोत.
-आशीष नहार, अध्यक्ष, निमा
राजूरबहुला येथे ८० एकर जागा संपादित आहे. त्यापैकी २५ एकर जागा आयटी पार्कला मिळेल. सोमवारी मंत्री सामंत यांना पत्र देणार आहोत. त्यांनी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर दोन वर्षांचा वेळ दिला आहे.
-मनीष रावल, उपाध्यक्ष, निमा
उद्योगमंत्र्यांनी आयटी पार्कसाठी ५० एकर जागा दोन टप्प्यात देण्याचे जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यातील २५ एकर जागेची घोषणा केली आहे.
– धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा