नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळीचा तडाखा
नाशिक (प्रतिनिधी )-
जिल्ह्यातील मनमाड, पानेवाडी परिसरात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि पानेवाडी परिसरात आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या अनपेक्षित हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. तर शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संकट घेऊन आला आहे.पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे.
कांदा बियाण्यालाही मोठा फटका बसला आहे. यासोबतच आंबा बागांमधील फळांचे देखील नुकसान झाले आहे.शेतकरी आधीच उत्पादन खर्चात वाढ, बाजारभावाची अनिश्चितता यामुळे चिंतेत असतात. त्यातच निसर्गाच्या या आणखी एका तडाख्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गातून होत आहे.