उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव महापालिकेचे जाहीर आवाहन
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे यामुळे होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत जळगाव शहर महानगरपालिकेने नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार, महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी झाल्यास अथवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास संबंधित पीडितांना रीतसर नुकसान भरपाई मिळणार आहे.
मा. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्रमांक ७१/२०२३ वर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी झाली होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते सुस्थितीत ठेवणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची मूलभूत जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे नुकसान झाल्यास त्यांना मोबदला देणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जळगाव महापालिकेने हे महत्त्वाचे जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे.
महानगरपालिकेच्या निवेदनानुसार, ज्या नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाला आहे किंवा ज्यांच्या नातेवाईकांचा अशा अपघातात बळी गेला आहे, त्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर करावा. हा अर्ज आवश्यक पुराव्यांसह शहर अभियंता कार्यालय, ९ वा मजला, सरदार वल्लभभाई पटेल महानगरपालिका प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी रोड, जळगाव या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती प्रत्येक अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची आणि पुराव्यांची सखोल पडताळणी करणार असून, त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना योग्य ती नुकसान भरपाई अदा केली जाईल. ही माहिती अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या निर्णयामुळे केवळ अपघातग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार नाही, तर महापालिकेवर रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल तातडीने व दर्जेदार पद्धतीने करण्याचा दबावही वाढणार आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसावा आणि नागरिकांच्या जीविताची किंमत प्रशासनाने ओळखावी, या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, शहरातील नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे.
