
‘न्हाई’च्या कार्यकारी अभियंत्यांचा हलगर्जीपणा, गुन्हा दाखलची मागणी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
लाडवंजारी मंगल कार्यालयासमोरील इच्छादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी, 25 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास सुमारे ४० ते ५० फुटांपर्यंत चारी झाल्यामुळे गंभीर अपघाताची घटना घडली. रस्त्यातील खोल चारीमुळे दुचाकी घसरून अजय विजय दहाड (वय ३८) यांची स्कुटर डिव्हायडरजवळ उलटली आणि ते रस्त्यावर फरफटत गेले. त्यामुळे त्यांच्या शरीरावरील भागांना जखमा झाल्या आहेत. दरम्यान, दुर्घटनेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावरील चारी दुरुस्त न केल्याबद्दल ‘न्हाई’चे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंके यांच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणाला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकखाली येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, दैव बलवत्तर म्हणून ते ट्रकच्या दोन्ही चाकांच्या मधोमध आल्याने मोठी शारीरिक दुखापत टळली. घटनेवेळी रस्त्याच्या पलीकडून जाणाऱ्या मनोज सोमनाथ दहाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अजय दहाड यांना मदतकार्य केले. त्यानंतर त्यांना डॉ. भूषण झंवर यांच्या ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचार व एक्स-रे तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
घटनेची माहिती आमदार राजू मामा भोळे यांनाही देण्यात आली. त्यानंतर त्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच खोटे नगर ते कालंकामाता चौकापर्यंतच्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


