विरोधकांकडून केला गेला विपर्यास
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील लिहा तांडा गावात मंत्री ना.गिरीष महाजन भंडाऱ्याच्या कार्यक्रमानिमित्त गेले होते. खराब रस्त्यासंदर्भात ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.
व्हायरल व्हिडिओबाबत पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी सांगितले की, जामनेर तालुक्यात ३० ते ३२ तांडे आहेत. त्या ठिकाणी रामदेव बाबा यांच्या सप्ताहाचे कार्यक्रम होत असतात. मी दरवर्षी त्याठिकाणी जात असतो. लिहा तांडा याठिकाणी मी गेलो होतो. तेथील सरपंच यांच्या बहिणीचा मृत्यू झाला होता. त्याठिकाणी मोठी गाडी जात नव्हती. त्यामुळे मी कार्यकर्त्याला घेऊन मोटर सायकलने त्यांच्याकडे जात असतांना कार्यकर्त्याने मला सांगितले की, भाऊ याठिकाणी पाण्याची डाब तुंबलेली आहे. त्यावेळी मीच कार्यकर्त्याला सांगितले की, पाण्यातून मोटर सायकल टाक काय व्ह्याचे, ते होईल बघून घेऊ. रस्त्याचा खोलगट भाग असल्याने आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने त्याठिकाणी पाणी तुंबलेले होते. गावात यात्रा होती आणि माझ्या मागे १०-१२ कार्यकर्त्यांच्या गाड्या होत्या. त्यामुळे मी त्याला पाण्यातून मोटरसायकल जोरात काढायला लावली. त्याचा विरोधकांकडून विपर्यास केला की, गावात एवढी घाण कशी आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने एवढी तेवढी घाण असेलही त्या गावात कामे सुरूच आहे.
लिहा तांडा गाव ८० टक्के भाजपाचेच
लिहा गाव हे जामनेर तालुक्यातील मोठे गाव आहे. तेथेही आमचीच सत्ता आहे. आमचाच सरपंच आहे. आणि लिहा तांडा हे गाव ८० टक्के भाजपाचेच आहे. एखाद दुसरी गल्ली राहून गेली असेल. मात्र, विरोधकांना याबाबत राजकारण करावयाचे आहे. ‘पुढे घोडा मैदान जवळच’ आहे. मी सहा टर्म झाले तालुक्याचे प्रतिनिधीत्व करत आहे. पुढील भाजपच्या उमेदवारासमोर तगडा उमेदवार उभा करावा त्यावेळेस खरे चित्र काय आहे, हे दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.