उशिरा येणाऱ्यांना होणार दंडात्मक कारवाई
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव शहर महानगरपालिकेत कामकाजातील शिस्त आणण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून आणि वेळेवर काम न होण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता महापौर स्वतः कार्यालयात उपस्थित राहून कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली.
महापौरांनी स्पष्ट सांगितले, “उद्यापासून सर्वांनी सकाळी पावणे दहा वाजता (९:४५) कार्यालयात हजर राहावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.” गेल्या काही दिवसांत नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींमध्ये अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे लक्षात आले होते. जळगावकरांचे म्हणणे आहे, “अधिकारी वेळेवर भेटत नाहीत, त्यामुळे आमची कामे रखडतात.”
सकाळी ९:५० ला महापालिकेत अचानक भेट दिल्यानंतर महापौरांनी लक्षात आणून दिले की, कर्मचाऱ्यांनी आता आपल्या सोईनुसार येण्याचे नियम थांबवून कर्तव्याची जाणीव ठेवावी. “आपण नागरिकांच्या करातून पगार घेतो आणि त्यांचे काम वेळेवर करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महापौरांचे महत्त्वाचे निर्देश:
-
वेळेचे पालन: सकाळी ९:४५ वाजेपर्यंत महापालिकेत हजेरी बंधनकारक.
-
शिस्तबद्ध हजेरी: हजेरी पत्रकावर सह्या करून प्रत्येकाने आपापल्या विभागात कामावर रुजू व्हावे.
-
दंडात्मक कारवाई: सकाळी १० वाजेपर्यंत हजर नसलेल्यांवर कठोर कारवाई.
-
सेवेची बांधिलकी: नागरिकांना सेवा देणे ही प्राथमिक जबाबदारी, कर्तव्याला खपवून घेतले जाणार नाही.
महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने हजेरीबाबत अधिकृत आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, लेटलातिफ कर्मचाऱ्यांची झाडाझडती करून शिस्तबद्ध कामकाजासाठी कठोर धोरण राबवले जाणार आहे.
या निर्णयामुळे जळगाव महानगरपालिकेत कामकाजाची वेळेत पार पडण्याची अपेक्षा आहे आणि नागरिकांच्या तक्रारींना लवकर उत्तर मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
