नंदुरबार उपनगर पोलिसात महिलेसह आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल
साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी :
आधीच्या लग्नाचा घटस्फोट झालेला नव्हता. असे असतानाही तो झाल्याचे खोटे सांगून नागपूर येथील एका महिलेने नंदुरबारातील एका घटस्फोटित व्यक्तीशी विवाह केला. त्यानंतर नांदण्यास नकार देत ही महिला सोन्याचे दागिने घेऊन माहेरी निघून गेली. दरम्यान, याप्रकरणी महिलेसह तिच्या आई-वडिलांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मूळचे रांझणी येथील रहिवासी तथा सध्या नंदुरबारातील श्रीरामनगर भागात राहणारे पुष्पेंद्र चिंधा भारती (वय ३९) यांचा पहिला विवाह झाला होता. काही कारणाने त्यांचा घटस्फोट झाला होता. दुसऱ्या विवाहासाठी ते समाजमाध्यमावर स्थळ शोधत असताना त्यांना नागपूर येथील एका महिलेविषयी स्थळाची माहिती मिळाली.
नंदुरबारात पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर २०२० मध्ये पुष्पेंद्र यांचा विवाह नागपूर येथील त्या महिलेशी झाला. विवाहात सोने-चांदीचे दागिने व इतर वस्तू महिलेला घेऊन देण्यात आल्या. विवाहानंतर रांझणी येथे नांदत असताना भांडण करून विवाहिता नंदुरबार येथे राहण्याचा आग्रह करू लागली. नंदुरबारातील श्रीरामनगरात राहत असताना नेहमीच भांडण करीत होती. गरोदर राहिल्यानंतर प्रसूतीसाठी नागपूर येथे गेली.
महिलेची प्रसुती झाल्यानंतर बाळ जन्मले होते. मात्र, ते जन्मल्यानंतर मरण पावले. त्यानंतर महिलेने नांदण्यास येण्यास नकार दिला. पुष्पेंद्र यांनी त्या महिलेची अधिक माहिती काढल्यावर त्या महिलेची यापूर्वी दोन लग्ने झाली होती. दोन्ही बाबतीत त्यांचा न्यायालयात दावा सुरू आहे. दुसऱ्या लग्नाबाबत त्यांचा घटस्फोट झालेला नाही.
१० लाखांची केली मागणी
नागपुरला पुष्पेंद्र हे महिलेला नांदविण्यासाठी घेण्यास गेल्यावर त्यांच्याकडून १० लाखांची मागणी करण्यात आली. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली. पहिल्या दोन जणांची जी स्थिती केली तीच करणार म्हणून धमकी दिली. तसेच लग्नातील सर्व दागिने ठेवून घेतले. फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर पुष्पेंद्र भारती यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने महिलेसह तिच्या आई-वडिलांविरुद्ध फसवणुकीचा आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहे.